राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय; संजय राऊतांची नागालँड सत्तास्थापनेवर प्रतिक्रिया

104

नुकत्याच ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यात विधानसभा निवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत तिन्हा राज्यात सरकार स्थापन केले आहे. नागालँडमध्ये एडीपीपी आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच ७ जागा जिंकून तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी माध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ‘नागालँडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केलेली नाही. भाजप तिथे जो एक प्रादेशिक पक्ष आहे, त्या पक्षाचे नेते रियो म्हणून आहेत. जे आमच्याबरोबर काही काळ संसदेत खासदार होते. त्यांचा प्रादेशिक पक्ष आहे. माझ्या माहितीनुसार, त्यांच्या पक्षाला २५ ते २६ जागा मिळालेल्या आहेत. त्यांचा मुख्य पक्ष आहे. नागालँड सीमावर्ती राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. आणि ते काश्मीरपेक्षा जास्त संवेदनशील आहे. तिथे सुद्धा दहशतवाद आणि इतर कारवायांचा सतत धोका असतो. रियो यांच्या पक्षासोबत भाजपची युती होती. भाजपला १० ते १२ जागा मिळालेल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एक येऊन सरकार बनवले आहे. आणि नागालँडमध्ये पहिल्यांदाच असे घडले, असे मला वाटत नाही. यापूर्वीही एकत्र सरकार बनवण्याचा प्रयोग नागालँडला झाला आहे. कारण ती त्या राज्यांची गरज आहे.’

पुढे राऊत म्हणाले की, ‘ज्याप्रकारे त्या राज्याच्या सीमेवर घडामोडी होत असतात, त्याच्यामुळे तिथे जास्त राजकीय संघर्ष असून नये, विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पाऊले टाकता यावी, यासाठी अशाप्रकारचे निर्णय नागालँडच्या बाबतीत घेतले जातात. अर्थात मला असे दिसतेय, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय. मी जे सांगतोय ते सत्य आहे. नागालँडची भौगोलिक, सुरक्षा विषयक परिस्थिती काश्मीरपेक्षा अनेकदा गंभीर असते. तिकडला मुख्य पक्ष तो वेगळा आहे, त्याचे सरकार आहे. सरकार भाजपचे नाही. भाजप त्यांच्या सरकारमध्ये सामील झालीय. पण ठीक आहे, यासंदर्भात महाविकास आघाडीची आज चर्चा आहे.’

(हेही वाचा –  मंत्री सामंतांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोला; म्हणाले, जर आमच्यासोबत गुवाहाटीला आले असते..; नेमकं काय घडलं?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.