पवारांच्या बंगल्यावरील हल्ला भोवला, १०९ एसटी कामगारांनी नोकरी गमावली

129

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष केला होता, मात्र अचानक दुसऱ्या दिवशी शुक्रवारी यातील काही कामगार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी धडकले. यावेळी आक्रमक झालेल्या कामगारांनी बंगल्याच्या दिशेने चप्पल आणि दगडफेक केली. या प्रकरणात १०९ कामगारांना अटक झाली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नियमानुसार सरकारी अधिकारी किंवा कामगार कोणत्याही फौजदारी गुन्ह्याखाली २४ तासांच्या वर कारागृहात राहिला, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाते, या नियमानुसार या १०९ कामगारांनाही नोकरी गमवावी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यासंबंधी स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनीही स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानावर ज्या एसटी कामगारांनी हल्ला केला होता, त्यांच्यावर सरकारने कारवाई करण्याचे ठरवले असून त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नसल्याचे मंत्री परबांनी सांगितले. सोमवारी, ११ एप्रिल रोजी एसटी महामंडळाची बैठक होणार त्यात याची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कंत्राटी भरती करणार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. तर इतर कर्मचारी 22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाहीत, तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचाही विचार केला जाणार आहे. ५ महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहितीही मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

(हेही वाचा मोठी बातमी! एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढले, सीएसएमटी स्थानकात कर्मचा-यांचा आक्रोश)

कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरु करणार 

संतप्त एसटी कामगारांनी थेट शरद पवारांच्या घरावर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या १०९ एसटी कामगारांना अटक केली, त्यांच्यावर पोलिसांनी सविस्तर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने १०९ कामगारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या हे कामगार तुरुंगात आहेत. कोणत्याही सरकारी कामगार किंवा अधिकारी २४ तास फौजदारी गुन्ह्याखाली कारागृहात राहिला तर त्याला नियमानुसार नोकरीवरून काढले जाते, या निकषानुसार आता या सर्व कामगारांना कायमची नोकरी गमवावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.