राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यावेळी घटनापीठासमोर युक्तीवाद करत आहेत. या युक्तीवादादरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रश्न तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा काय मोडला, एका कारणावरुन तुम्ही हा निर्णय कसा घेतला? असा सवाल सरन्यायाधीश यांनी केला.
सरन्यायाधीशांनी केलेले प्रतिप्रश्न
राज्यपालांनी कशाच्या आधारावर बहुमत चाचणीचे आदेश दिले?
34 आमदारांनी त्यांचे मतभेद स्पष्ट केले. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारचे बहुमत खाली आले होते. पण त्याचा परिणाम काय झाला? राज्यपालांनी त्यांना शिवसेनेचेच सदस्य म्हणून गृहीत धरायला हवे होते. मग जर ते शिवसेनेच्या 56 सदस्यांपैकी असतील तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो? कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले, असा सवाल सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना केला.
( हेही वाचा: मंत्री व्हायला पुढे-पुढे करता, मग सभागृहात का बसत नाही? अजित पवारांनी सुनावले )
आम्हाला याची काळजी वाटतेय- सरन्यायाधीश
महाराष्ट्र हे एक राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे राज्याला कलंक लागत आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्हाला या सर्व गोष्टींची काळजी वाटते, असे सरन्यायाधीश म्हणाले.
फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? सरन्यायाधीश
राज्यपालांना असे वाटले की शिवसेनेतील एका गटाला पक्षाच्या आघाडीसोबत जाण्याच्या निर्णयावर विरोध आहे. मग फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का? मग एका अर्थाने ते पक्षच तोडत आहेत, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
- 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.
- 3 वर्षांत तुम्ही एकही पत्र लिहिले नाही आणि एका आठवड्यात सहा पत्रे कशी लिहीली?? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. तसेच, 3 वर्षे आनंदाने नांदल्यानंतर एका कारणामुळे एका रात्रीत संसार कसा काय मोडला? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला.