विरोधकांना विस्मृतीचा आजार; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

120
शिंदे- फडणवीस सरकारवर आज विविध आरोप करणाऱ्या विरोधकांना विस्मृतीचा आजार झाला आहे, असा आरोप करीत मविआ सरकारच्या काळातील घटनांची आठवण करुन देत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत जोरदार पलटवार केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेच्या दुसऱ्या दिवशी आशिष शेलार यांनी भाषण केले. राज्यपालांचे अभिनंदन करीत त्यांच्या भाषणाचे अभिनंदन  करणाऱ्या आमदार अतुल भातखळकर यांच्या ठरावाचे शेलार यांनी समर्थन केले. राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे शिंदे -फडणवीस सरकारच्या आगामी काळाचा आणि विकास कामांचा रोड मॅप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांना विस्मृतीचा आजार जडला आहे. त्यामुळे त्यांना मागील अडीच वर्षातील गोष्टी आठवत नाहीत. म्हणून आठवण करुन देतो असे सांगत आमदार अँड आशिष शेलार यांनी काही गोष्टींना उजाळा दिला. संसदेत पारित झालेल्या कायद्यावर एक विदेशी पॉप स्टार रिहानने जेव्हा मते मांडली त्यावेळी भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी त्या स्टारला खडसावणारा जबाब दिला. देशासाठी बोलणाऱ्या या दोन महान व्यक्तींची चौकशी करण्याची भूमिका तत्कालीन आघाडी सरकारने घेतली, तर हिंदूंना सडके म्हणणाऱ्या सर्जिल उस्मानीवर पुण्यात येऊन भाषण केले तर साधी तक्रारसुध्दा दाखल करुन घेतली नाही आणि तेच नेते आम्हाला आज कायदा सुव्यवस्था शिकवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

आमची वक्तव्ये बेताल, तर सुषमा अंधारेंचे काय?

  • आमच्यावर बेताल वक्तव्याचा आरोप केला जातोय एकदा सुषमा अंधारे, प्रभू राम, हनुमान, ज्ञानेश्वर, एकनाथ या संतश्रेष्ठांवर काय बोलल्या हे आठवा, असे सांगून त्यांची वादग्रस्त वक्तव्यच आमदार अँड आशिष शेलार यांनी वाचून दाखवली. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवणही त्यांनी करुन दिली.
  • आजच्या सरकारवर अहंकाराचा आरोप करताय पण एका पत्रकाराला कोरोना काळात शेकडो किमीचा प्रवास करुन फरफटत मुंबईत आणले त्याचा दोष एवढाच की कोरोना काळात मोकाट फिरणाऱ्या एका आरोपीची बातमी त्याने दिली. याचीही आठवण करुन दिली.  केंद्रीय मंत्र्याला झालेली अटक अहंकार याला म्हणतात.
  • आज मार्मिकच्या कार्टूनवर बोलताय पण तत्कालीन सरकारवर काढलेले कार्टून पुढे पाठवले म्हणून एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचा डोळा तुम्ही फोडलात हे कसे विसरता, असा सवाल शेलार यांनी केला.

बिल्डरांना हजारो कोटींची खैरात वाटली

कोस्टल रोडला परवानगी घेताना सरकारने ज्या अटी मान्य केल्या त्याही दोन वर्षात पूर्ण केल्या नाहीत, त्या शिंदे फडणवीस सरकारनेच पुर्ण केले. त्यासोबत नवे सरकार आल्यावर गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र उत्सव जोरात साजरे झाले वातावरण कसे बदलले याची आठवण ही त्यांनी करुन दिली. तसेच कोरोना काळात हजारो कोटींची खैरात बिल्डरांना दिली त्यामुळे मुंबईत बेसुमार बांधकाम सुरू असून धुळीमुळे, प्रदूषणाने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे याला जबाबदार तत्कालीन आघाडी सरकार आहे याची आठवणही करुन दिली. आंगणेवाडी परिसरात करण्यात आलेले रस्ते, मुंबईतील सार्वजनिक शौचालये, यासह एसटीत ज्येष्ठांना देण्यात आलेली सवलत अशा अनेक चांगल्या गोष्टींंचा उल्लेख भाषणात  केला असता तर चालले असते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.