Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा अन्यथा…; सदावर्तेंचा सरकारला इशारा

52
Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा अन्यथा...; सदावर्तेंचा सरकारला इशारा

सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही अज्ञात व्यक्तींकडून सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यामागे मराठा आंदोलक असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. अज्ञातांनी या गाडीच्या एका बाजूच्या सर्व काचा पूर्णपणे फोडल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या गाडीवर काळा कपडा टाकून ती झाकण्यात आली. या गाडीसोबत गुणरत्न सदावर्ते यांच्या मालकीची आणखी एक गाडी फोडण्यात आली आहे.

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा

“जरांगे तुम्हाला मी सांगतो, (Gunaratna Sadavarte) देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंता तोडमोड केली जाऊ शकते”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

जरांगेचे लाड थांबवले नाहीत, तर… 

“मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल”, असंही सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले आहेत.

जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील नेमका वाद काय?

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील सभेत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध करतात. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. जरांगे यांच्या टीकेनंतर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनीही त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता. महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला झालेली गर्दी म्हणजे निव्वळ जत्रा होती, अशी बोचरी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.