‘सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ! भ्रष्टाचार, निर्लज्जतेचा कळस’, फडणवीसांचा सरकारला संतप्त सवाल

109

राज्यातील विविध परीक्षांच्या आयोजनातील गोंधळा होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ संपत नाही तोपर्यंत आता म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. म्हाडाच्या भरती परीक्षेसंदर्भात ऐनवेळी घोळ झाला. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

(हेही वाचा-  मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली?, पडळकरांचा सवाल; म्हणाले…)

भरतीचा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार गप्प

या प्रकरणावरून संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? इतकेच नाही तर फडणवीस पुढे असेही म्हणाले की, आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत पोचले. आता म्हाडाच्या परीक्षेतही तोच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे का? सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच, पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही.

म्हाडाची परीक्षा जानेवारीमध्ये होणार

म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार असून राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यासह जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले, “सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे.”

स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा कायम

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून शनिवारी हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती येथील विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा रद्दची घोषणा आधीच केली असती तर नाहक धावपळ, त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.