वीजेच्या संकटामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी लोड शेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील जनता आधीच त्रस्त आहे. असे असताना आता राज्याच्या हिताचे निर्णय जिथे घेण्यात येतात त्या मंत्रालयातही अचानक बत्ती गुल झाली आहे. बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री बोलत असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बैठकीचा चांगलाच खोळंबा झाला.
ओबीसी आरक्षणावरील चर्चेदरम्यान बत्ती गुल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रीमंडळातील आपल्या सहका-यांशी संवाद साधत होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असतानाच, अचानक मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झालेले मुख्यमंत्री काही काळासाठी डिस्कनेक्ट झाले.
(हेही वाचाः महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही – जयंत पाटील)
कारण काय?
वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बैठकीला सुरुवात केली. पण काही काळासाठी आलेल्या या व्यत्ययामुळे बैठकीत मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे जिथून राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
Join Our WhatsApp Community