भाजप-राष्ट्रवादी युती ठरली होती, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती.

208
भाजप-राष्ट्रवादी युती ठरली होती, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे राजकारणात पुन्हा एकदा नव्याने पहाटेचा शपथविधी हा विषय रंगू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावरून पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी कशी तयारी झाली होती? शरद पवार यांच्या उपस्थितीत कशा बैठका पार पडल्या होत्या याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. हे मी अंडरलाईन करतोय. असं विधान फडणवीसांनी केलं आहे.

(हेही वाचा – पावसाची संततधार : अंधेरी सबवे बंद, तर घरावर झाड कोसळून एकाचा मृत्यू)

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. हे मी अंडरलाईन करतोय. त्या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचं ठरलं. कोणत्या प्रकारे सरकार स्थापन करायचं याची मोड्स ऑपरेंडी तयार झाली. सरकार स्थापनेचा करारही झाला होता. अजित पवार आणि मी हे पुढे नेणार असं ठरलं. आम्हा दोघांना अधिकार दिले गेले. त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण तयारी केली. तयारीनंतर एका वेळी पवार त्यातून हटले. आमच्या शपथविधीच्या तीन चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत होती.

शरद पवार यांची मिस्ट्री समजायची असेल तर त्यांच्या हिस्ट्रीत जावं लागेल. तेव्हाच त्यांची मिस्ट्री समजेल. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी नातं तोडलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली होती. त्यांची चर्चा पुढे जात असताना उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं होतं. कारण ते आमचा फोनही उचलत नव्हते.

त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत होती. त्यामुळे आपल्यासमोर काय पर्याय आहे याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो असं सांगितलं. आम्हाला स्थिर सरकार हवं, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आमची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू झाली, असा दावाही त्यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.