Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले – रणजित सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिले जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण रविवार, 26 मे रोजी उत्साही वातावरणात करण्यात आले.

99
Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले - रणजित सावरकर
सामर्थ्य गमावल्यामुळे आपल्यावर पहिला हल्ला २३०० वर्षांपूर्वी ग्रीकांचा झाला. त्यानंतर ते हल्ले सुरूच राहिले. आमच्यातील काही लोकांनी ते परतवूनही लावले, पण हळूहळू आपल्यातील सैनिकीक्षमता कमी होत गेली आणि साधारण १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या डोक्यावर बसले, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार – २०२४’च्या सोहळ्यात ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, 26 मे रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाला. स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  रणजित सावरकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह आयआयटी इंदूरचे डॉ. सुहास जोशी, सावरकर विचार प्रसारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर आणि  ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा हे उपस्थित होते.
रणजित सावरकर म्हणाले की, शेकडो, हजारो वर्षांपूर्वी आपला देश सुवर्णभूमी होता, जगातील उत्तम राष्ट्र म्हणून आपण प्रगतशील होतो. जेव्हा जर्मनीमध्ये तिथल्या लोकांना लिहिता, वाचता येत नव्हते, तेव्हा आमच्याकडे संस्कृत महाग्रंथ तयार होत होते. संपत्ती, सत्ता, सामर्थ्य या आधारावर आपण प्रगती करत होतो. परंतु श्रीमंत झाल्यावर पुढच्या पिढीत काही दुर्गुण येतात तसे आपल्यातही आले. संपन्नतेमुळे आपण आपले सामर्थ्य गमावले. सामर्थ्य गमावल्यामुळे आपल्यावर पहिला हल्ला २३०० वर्षांपूर्वी ग्रीकांचा झाला. त्यानंतर ते हल्ले सुरूच राहिले. आमच्यातील काही लोकांनी ते परतवूनही लावले, पण हळूहळू आपल्यातील सैनिकीक्षमता कमी होत गेली आणि साधारण १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या डोक्यावर बसले. स्वातंत्र्य मिळून आपल्याला फक्त ७७ वर्षे झाली आहेत आणि आपण आता कधीकाळी पारतंत्र्यात होतो हे विसरत चाललो आहोत, जणू काही आम्ही कधी गुलामीत गेलोच नव्हतो असे समजू लागलो आहोत. ज्या चुका आपण पूर्वी केल्या त्या आपण पुन्हा करू लागलो आहोत.

काय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे वैशिष्ट्ये?  

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्रदान करण्यात येत असलेल्या पुरस्काराचे वैशिष्ट्ये सांगताना रणजित सावरकर म्हणाले,  सावरकर (Veer Savarkar)  हे अत्यंत उपयुक्ततावादी होते, प्रत्येक गोष्टीचा देशासाठी उपयोग झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते, म्हणूनच सावरकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आम्ही हे पुरस्कार देतो, त्याचाही उपयोग देशाला झाला पाहिजे अशी आमची यामागची भूमिका आहे. सैनिकी सामर्थ्य आपण गमावले त्यामुळे आपल्यावर गुलामगिरी आली म्हणून आम्ही शौर्य पुरस्कार देतो. आमची वैज्ञानिक प्रगतीच खुंटली. पाणिनीनंतर १५०० वर्षांत तुमच्याकडे शास्त्रीय संशोधनच नाही. जेव्हा शास्त्रीय संशोधन नसते तेव्हा तेही राष्ट्राचे सामर्थ्य खच्ची करते. जेव्हा मोघलांचा हल्ला झाला तेव्हा ते केवळ त्यांच्याकडे असलेल्या धनुष्यबाणामुळे विजयी झाले. आपण राम, कृष्ण यांची नावे धनुर्धारी म्हणून घेतो त्या शस्त्राविषयी अधिक संशोधन केलेच नाही. मुघलांनी ते केले आणि आपण पराभूत झालो. म्हणून आमचा दुसरा पुरस्कार विज्ञान पुरस्कार आहे. तुमच्यकडे शस्त्र, विज्ञान आहे. पण जर तुमच्याकडे विचार नसतील तर त्याला काही महत्व नाही. त्यामुळे जे वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांचे अनुकरण करतात, प्रसार करतात अशा मान्यवर व्यक्तींना आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार देतो. आज विशेष पुरस्कार रणदीप हुड्डा यांना देत आहोत. त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर’ या चित्रपटाची निर्मिती केली. आज जे काही वॉरफेरचे नवनवीन प्रकार आले आहेत त्यातील एक इन्फॉर्मेशन वॉरफेर हा एक प्रकार आहे. त्यातून राष्ट्रवादी विचारधारेवर वारंवार हल्ले होत आहेत. वीर सावरकर (Veer Savarkar) हे आमचे हिरो आहेत म्हणून आज जी आधी वीर सावरकर यांनाच नष्ट करूया आणि त्यांची प्रतिमा भ्रष्ट करा, यासाठी जी मोठी मोहीम सुरु झाली आहे. हा त्याचा वॉरफेरचा भाग आहे. त्याला हुड्डा यांनी हा चित्रपट बनवून चांगले उत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांना हा विशेष पुरस्कार देत आहोत, असे रणजित सावरकर म्हणाले.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.