Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीला काँग्रेसचा सुरुंग, लोकसभेच्या २२ जागांवर दावा; मुंबईतील चार मतदारसंघांचा समावेश

लोकसभेच्या जागा वाटपावरून अद्याप महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्राथमिक चर्चाही झालेली नसताना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागांचे आकडे सांगायला सुरुवात केली आहे.

206
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीला काँग्रेसचा सुरुंग : मुंबई लोकसभेच्या २२ जागांवर दावा; मुंबईतील चार मतदारसंघांचा समावेश

सुहास शेलार

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे केले जात असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. तिन्ही पक्षांतील (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट) अंतर्गत युद्ध टोकाला पोहोचले असून, जागा वाटपावरून केव्हाही ‘मविआ’त फूट पडू शकते. कर्नाटकच्या विजयानंतर अतिआत्मविश्वास संचारलेली काँग्रेस या फुटीचे प्रमुख कारण ठरू शकते.

लोकसभेच्या जागा वाटपावरून अद्याप महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्राथमिक चर्चाही झालेली नसताना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागांचे आकडे सांगायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला आहे. राष्ट्रवादीकडूनही लोकसभानिहाय आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या महाराष्ट्र काँग्रेसने लोकसभेच्या २२ जागांवर दावा ठोकण्याचे ठरविले आहे. तसा ठराव करून तो काँग्रेस हायकमांडच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतर तो महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Pankaja Munde : माझं राजकारण केवळ लोकांसाठी – पंकजा मुंडे)

मागील दोन निवडणुकांच्या आधारावर लोकसभेचे जागावाटप न करता मेरीटवर जागावाटप झाले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने (Mahavikas Aghadi)
घेतली आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांच्या कोअर समितीच्या बैठकीत काँग्रेसला अनुकूल लोकसभेच्या जागांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य, उत्तर मुंबई, भिवंडी, सांगली, कोल्हापूर, पुणे, धुळे, नंदुरबार, रावेर, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नागपूर, रामटेक, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती अशा २२ जागांचा समावेश आहे. काँग्रेसने दावा केलेले लोकसभेचे हे २२ मतदारसंघ त्यांनी यापूर्वी जिंकलेले आहेत. ठाकरे गटाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या बुलढाणा, रामटेक, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपात या जागांवरून वाद होऊ शकतो. रामटेकच्या जागेसाठी ठाकरे गटाकडे उमेदवार नाही, ती जागा काँग्रेसने लढविली तर जिंकता येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचा प्लॅन काय?

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक वर्षे आमदार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत पक्षाची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीने २०१९ साली लढविलेल्या २२ मतदारसंघांचा आढावा घेतला.

लोकसभेच्या ज्या संभाव्य जागा राष्ट्रवादी लढविणार आहे, त्या मतदारसंघांत अपेक्षित उमेदवाराबाबत पक्ष सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेत ज्या उमेदवाराला जास्त पसंती मिळेल, त्याला उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादीला मागील लढविलेल्या जागा मिळाव्यात, अशी भूमिका काहींनी मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविलेल्या जागांपैकी ज्या ठिकाणी ठाकरे गटाचा खासदार आहे त्या जागा सोडण्याची वेळ आली तर तयारी ठेवावी लागेल, हे पवारांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.

हेही पहा – 

लोकसभा नको, विधानसभा हवी!

अनेक वर्षे आमदार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मात्र, अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) चांगले वातावरण आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल आणि राज्यात सत्ता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते लोकसभा लढवण्यास तयार नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.