राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बुधवारी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गट प्रमुखांच्या मेळावा घेत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा असे आवाहन भाजपला केले आहे. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मला संपवू शकत नाहीत
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 2019 मध्येही तुम्ही माझआ शेवट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडीच वर्ष तिघांनी मिळून मला संपवायचा प्रयत्न केला पण मला संपवू शकला नाहीत आणि आताही तुम्ही संपवू शकत नाहीत, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
हिंमत होती तर तुम्ही राजीनामे द्यायचे होते
आम्ही कायदेशीररित्या निवडून आलो आहोत. मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामे देऊन निवडणुका का घेतल्या नाहीत,असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नाही तर भाजपसोबत पंतप्रधान मोदींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत निवडून यायचं होतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community