NCP : २०१९मध्ये ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांना आता लोकशाही समजेल; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय म्हणाले फडणवीस?

223

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देऊन शरद पवार यांच्या पक्षाला गट म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाला शरद पवारांचा गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या निर्णयावर आता राजकीय पातळीवर प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर जोरदार प्रतिक्रिया देताना २०१९ च्या सत्तांतराची आठवण करून दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) तसेच घड्याळ चिन्ह दिले आहे. मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. या निर्णयामुळे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  (NCP) सरकारमध्ये उत्तम काम करेल. निवडणूक आयोगाचा निर्णय हा कायद्याला धरून आहे. शेवटी पक्षाची घटना हीच सर्वस्वी असते. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. या निर्णयामुळे २०१९ मध्ये ज्यांनी लोकशाहीचा खून केला, त्यांना आता लोकशाही काय असते हे समजेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा NCP : कोणत्या पवारांच्या बाजूने किती आमदार ? निवडणूक आयोगाचे निकालपत्र काय सांगते ?)

२०२३ च्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  (NCP) फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसेच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचे प्रकरण प्रलंबित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.