शिवसेना आक्रमक, पण भाजपचा सेनापती शांत

86

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरावर शिवसैनिकांनी केलेली चाल आणि त्यानंतर भाजपचे मोहिम कंबोज आणि माजी खासदार किरीट सोमय्यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यानंतर भाजपने आक्रमकपणा दाखवण्याचा इशारा दिला. मुंबईत यासर्व घटना घडत असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष कुठे नेतृत्व करताना दिसत नाही. महत्वाच्या लढ्याच्या वेळी तसेच पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचा सेनापतीच गायब असल्याने शिवसेनेविरोधात लढायचे कसे असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. लोढा हे आपल्या व्यावसायिक हितसंबंधामुळे शिवसेनेला तथा सरकारला शिंगावर घेण्यास तयार नाहीत का असा सवाल आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

( हेही वाचा : नवनीत राणांनी वापरले पोलीस अधिकाऱ्यांचे वॉशरूम! पोलिसांनी अहवालात केले नमूद )

मुळमुळीत धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

मुंबईत मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेने मातोश्रीबाहेर गदी करत राणा कुटुंबियांच्या घराबाहेरही आंदोलन केले. परंतु राणा कुटुंबियांकडून हे हनुमान चालिसा पठन करण्याचे आव्हान मागे घेतल्यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक केले. परंतु त्या आधी मातोश्रीच्या परिसरात जाणाऱ्या भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर राणा कुटुंबियांची पोलिस ठाण्यात भेट घेण्यास गेलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक केली. या तिन्ही घटनांमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष रस्त्यावर उतरुन पोलिस ठाण्यात गेल्याचे दिसून आले नाही.

माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांनी आम्हीही दगड हाती घेऊन आणि जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. परंतु यासर्व घडामोडींमध्ये भाजपचे मुंबईचे सेनापती असलेले अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे नेतृत्व कुठेही दिसून आले नाही. एका बाजुला दोन्ही हल्ल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक पावित्र्यात असतानाच दुसरीकडे मुंबई अध्यक्षांकडून कोणतेही आदेश देण्यात आले नाही. भाजपच्या अध्यक्षांच्या मुळमुळीत धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे.

मवाळ भूमिका

एका बाजूला शिवसेना आक्रमक होत असताना दुसरीकडे भाजपचे मुळमुळीत धोरण हे शिवसेनेची शक्ती वाढवताना दिसत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचे चेहरे असून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ते पक्षात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष यांच्या मवाळ भूमिका अंगीकारली आहे. लोढा हे पेशाने बांधकाम व्यावसायिक असून त्यांना सध्या आक्रमक भूमिका घेतल्यास आपल्याला व्यावसायात अडचणी येवू शकतात याची भीती वाटत आहे का असे बोलले जात आहे. यामुळेच भाजपचे कार्यकर्ते नेहमी कच खाताना दिसत आहे. मात्र, लोढा यांचे हे धोरण शिवसेनेच्या पथ्यावर पडत असून लोढा यांच्या सक्रिय न होण्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही संभ्रमात पडल्याचे पहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.