‘राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेबांची शिवसेना संपवू पाहत आहे’, शेलारांची बोचरी टीका

110

राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. यामध्ये भाजपला चांगले यश प्राप्त झाले असून या निवडणुकांमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष बनल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यावरुनच आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचा घाट घालत आहे, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी ट्वीट करत लगावला आहे.

आतातरी उद्धव ठाकरेंचे डोळे उघडतील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आजच्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुयात, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. हीच भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती, असेही आशिष शेलार यांनी टीका करताना म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘ग्रामपंचायतींमधील विजय ही महापालिका निवडणुकांमधील विजयाची नांदी’, फडणवीसांचे सूचक वक्तव्य)

हे मराठी माणसाचे यश

भाजपला या निवडणुकांमध्ये मिळालेले यश ही आनंदाची गोष्ट आहे. खरं तर महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच भाजपला हे यश मिळाले आहे. भाजपसोबत मराठी मते होती आणि आजही आहेत. राज्यातील जनतेची दुप्पट वेगाने सेवा करण्याचे व्रत घेऊन आम्ही हा विजय स्वीकारतो, असेही आशिष शेलार यांनी यावेळी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.