राज्यपालांकडे भाजप करणार सत्ता स्थापनेचा दावा!

भाजपकडे 25 चे संख्याबळ

95

विधानसभा निकालांनंतर गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपला 40 पैकी 20 जागा मिळाल्या असून तीन अपक्षांनी पाठिंबा देखील जाहीर केलाय. तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे भाजपकडे 25 चे संख्याबळ असून राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा

गोव्यात सत्तास्थापनेच्या बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि ऍलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे. गोव्यातील 40 जागांवर आत्तापर्यंत भाजप 20 जागांवर विजयी झाली आहे. सावंत यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत या निवडणुकीत जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी (मगो) राज्यातील स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचा भाग असणार आहे. एमजीपीने भाजपला पाठिंब्याचे पत्र दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बहुतांशी शुक्रवारी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘ऑपरेशन गंगा’ला प्रांतवादाशी जोडले जाणे चुकीचे! पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल )

भाजपकडे एकूण 25 उमेदवारांचे संख्याबळ

राज्यात भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच दोन जागा जिंकणाऱ्या एमजीपीने आम्हाला समर्थनाचे पत्रही दिले आहे. सोबतच तीन अपक्ष आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपकडे एकूण 25 उमेदवारांचे संख्याबळ आहे. त्याशिवाय आणखी उमेदवार आमच्यासोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.