परबांवरील आरोपांनी वाढली मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी

अनिल देशमुख यांच्यामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढवली असताना, आता शिवसेनेच्या अनिलवरील आरोपांचा सिलसीला आता शिवसेनेची डोकेदुखी वाढवणार का?

82

अनिल परब… राज्याचे परिवहन मंत्री आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे असे शिवसेनेचे नेते. मागील काही वर्षांत अनिल परब यांचा मातोश्रीवरील दबदबा इतका वाढला, की मातोश्रीच्या या वकिलामुळे काही जुन्या जाणत्या शिवसेनेच्या नेत्यांनी मातोश्रीकडेच पाठ फिरवल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांवर सध्या आरोपांचा सिलसीला सुरू आहे. आधी सचिन वाझेंनी लिहिलेले पत्र, तर आता त्यांच्यावर त्यांच्याच परिवहन विभागातील अधिकाऱ्याने ३०० कोटींचा आरोप करत पोलिस ठाण्यात केलेली तक्रार, यामुळे अनिल परब पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

अनिल परब हे सातत्याने विरोधकांच्या रडारवर असल्याने आता मातोश्रीची डोकेदुखी वाढली आहे. अनिल परब यांच्यावर आरोप होताना थेट मातोश्रीवर बोट उचलले जात असल्याने, मुख्यमंत्र्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे. आधीच अनिल देशमुख यांच्यामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढवली असताना, आता शिवसेनेच्या अनिलवरील आरोपांचा सिलसीला आता शिवसेनेची डोकेदुखी वाढवणार का? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.

परबांवरील आरोप थांबता थांबेना

आधीच अनिल परब हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असतानाच, त्यांच्यावर आता दुसरा आरोप होऊ लागला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलिस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पाच दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत, ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

(हेही वाचाः आता अनिल परबांचा ३०० कोटी बदली घोटाळा?)

सोमय्यांनी केली होती मागणी

किरीट सोमय्या यांनी देखील रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करुन, फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रीपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२० मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती.

(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)

मुख्यमंत्री परबांचा राजीनामा घेणार का?

अनिल परब हे विरोधकांच्या रडारवर असताना आणि थेट आता मातोश्रीवर बोट दाखवले जात असताना, अनिल देशमुखांना जसा शरद पवार यांनी राजीनामा द्यायला सांगितला, तसाच निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेची प्रतिमा वाचवण्यासाठी घेणार का? अशी चर्चा देखील सुरू आहे. काही शिवसेनेच्या नेत्यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी देखील सावध प्रतिक्रियाच दिली आहे. एवढेच नाही तर अनिल परब यांच्या विरोधात शिवसेनेतील एक गट देखील सक्रीय झाल्याचे समजते. आधीच मातोश्रीवरील अनिल परब यांचे वाढलेले वजन यामुळे काही शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज असताना, आता अनिल परब यांच्यावर सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे शिवसेनेतील काही नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः राणेंची हरकुळच्या परबांवर मालवणीत टीका, काय म्हटल्यानी? तुम्हीच वाचा…)

ही तर राजकीय हेतूने तक्रार- परब

अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर अनिल परब यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध, तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलिस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलीन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलिस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असे अनिल परब म्हणाले.

त्यावेळी घेतली थेट बाळासाहेबांची शपथ

एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेने एनआयएला एक पत्र लिहिले होते. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र त्यावेळी अनिल परब यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मी माझे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या अतिप्रिय असणाऱ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की हे सर्व आरोप खोटे आहेत. मला नाहक बदनाम केले जात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण तयार केले आहे. त्याचमुळे हे सांगत होते की, आम्ही या सरकारची तिसरी विकेट घेणार आहोत. माझ्यावर आणि अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर दोन आरोप केले त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही. मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम केले जात आहे. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले, त्यांना वस्तुस्थिती कळावी यासाठी मी आपल्या समोर आल्याचे परब त्यावेळी म्हणाले होेते.

(हेही वाचाः माझ्यावरील आरोप खोटे, चौकशीला तयार! अनिल परब यांचा वाझेंच्या आरोपावर खुलासा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.