३१ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अनिल परब राजीनामा द्या!

73

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. एसटीचे राज्य सरकारी विभाग म्हणून विलीनीकरण व्हावे यासाठी हा संप पुकारला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. बीडमधील एसटी कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांचा डॉक्टरांमुळे प्राण वाचला, तरीही परिस्थिती नाजूक आहे. यामुळेच गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीका करत ३१ कर्मचा-यांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्री अनिल परब राजीनामा देणार का?, असा सवाल केला.

काय म्हणाले पडळकर?

आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, पण हे प्रस्थापितांचे सरकार झोपेचे सोंग घेत आहे आणि न्यायालयाची दिशाभूल करत आहे. जर त्यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती, तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती. जराही नैतिकता शिल्लक असेल, तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब हे राजीनामा देणार का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असेही पडळकरांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : आता संपूर्ण एसटी होणार ठप्प?)

मुख्यमंत्र्यांना चर्चा करायला वेळ नाही

आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात, पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा देत गोपीचंद पडळकरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.