Kulgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हिंदू स्थलांतरित मजुरांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरातील एका वीटभट्टीवर शुक्रवारी (31 जुलै) रात्री उशीरा झालेल्या या गोळीबारात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी शोधमोहीम सुरू केली असून, मृत पावलेले दोन्ही कामगार हिंदू असल्यामुळे, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यातही आधी मरणाऱ्यांची ओळख विचारुन मग त्यांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मजुराचे नाव दीपक कुंजाम (वय 24) असून तो छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तर भूपेंद्र हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही रोजगारासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते आणि कुलगाममधील एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होते. (Kulgam Terror Attack)
हेही वाचा: India Weather Alert : सावधान! देशभरात मान्सूनचा रौद्रावतार; ‘या’ राज्यांत पूर आणि ढगफुटीचा इशारा
अचानक गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण
प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या वेळी अज्ञात दहशतवादी वीटभट्टीवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मजुरांवर जवळून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दीपक कुंजाम यांचा मृत्यू झाला, तर भूपेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्याशी तुलना
या हल्ल्याची तुलना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी केली जात आहे. ज्याप्रमाणे पहलगामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळख आणि त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्याचप्रमाणे काही वृत्तांनुसार कुलगामध्येही हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी दोन्ही मजुरांची ओळख आणि धर्म विचारल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत पुष्टी केली नसल्यामुळे, तपास पूर्ण होईपर्यंत या दाव्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. (Kulgam Terror Attack)
दरम्यान, हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफने संपूर्ण परिसराला वेढा घालत संयुक्त शोधमोहीम (CASO) सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये बिगर स्थानिक आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य करणाऱ्या घटना अधूनमधून घडत आहेत. या ताज्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. (Kulgam Terror Attack)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


