मुंबई पोलिसांनी कारवाई टाळण्यासाठी मेघालयात पळून गेलेल्या २० बांगलादेशी नागरिकांना (Bangladesh Infiltrator) बँक खाती उघडण्यास मदत करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जबीर युनूस शेख आणि नुसरत अर्शद काझी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारे आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांना मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मेघालय पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखा आणि मानव तस्करी विरोधी पथकाने तसेच स्थानिक पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरावर (Bangladesh Infiltrator) कारवाई सुरू केली होती, पोलिसांच्या या कारवाईमुळे मुंबई आणि नवी मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी दुसऱ्या राज्यात आश्रय घेण्यासाठी येथून पळ काढत आहे. दरम्यान नवी मुंबईतून मेघालयात गेलेल्या बांगलादेशीपैकी २० नागरिकांना मेघालय पोलिसांनी अटक केली होती.
तपासात या २० जणांचे भारतात बँक खाते असून हे बँक खाते उघडून देण्यास मदत करणारी एक महिला आणि पुरुष नवी मुंबई कोपरखैरणे येथे राहत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. या माहितीच्या आधारे, मेघालयातील एक विशेष पथक या दोघांच्या अटकेसाठी नवी मुंबईत पोहोचले. (Bangladesh Infiltrator) तांत्रिक आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीचा वापर करून, नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणे येथील सेक्टर १२ बी येथे संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना मेघालय पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपींना ईशान्य राज्यात पुढील चौकशी आणि तपासासाठी नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे आणि एसीपी धर्मपाल बनसोडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निरज चौधरी आणि पृथ्वीराज घोरपडे, एपीआय अलका पाटील, पीएसआय प्रशांत कुंभार आणि त्यांच्या संबंधित पथकाने ही कामगिरी पार पाडली.
Join Our WhatsApp Community