
Indian Railway: भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पदक विजेत्या जवानांना रेल्वेमध्ये आजीवन मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ संबंधित पदक विजेत्यासह त्याचा पती किंवा पत्नीलाही मिळू शकेल. अविवाहित असतानाच हुतात्मा झालेल्या पदक विजेत्यांच्या पालकांना देखील ही सुविधा मिळू शकेल.
या निर्णयानुसार पात्र लाभार्थींना प्रथम श्रेणी, द्वितीय वातानुकूलित श्रेणी आणि वातानुकूलित चेअर कारमधून प्रवास करता येईल. या सुविधेसाठी पात्र व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या रेल्वे सवलत कार्ड पोर्टलवर नोंदणीची सोय असेल.
ऑनलाइन ई-पास मिळणार
नोंदणी केल्यानंतर संबंधित लाभार्थींची माहिती आणि पात्रतेची पडताळणी केली जाईल. त्यानंतर ऑनलाइन ई-पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. या ई-पासच्या आधारे रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढता येईल. पात्र लाभार्थींना एक नोव्हेंबर २०२६ पासून भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीतून बुकींग करता येईल.
‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध होईल. देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणारे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शौर्यपदक विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासाच्या सुविधेमुळे देशभरात रेल्वेने प्रवास करता येईल.
हेही पहा –

