महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अवघे सरकार अस्थिर बनवण्याची रणनीती आखली आहे. मात्र सोमय्यांच्या या रणनीतीमध्ये पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा वापर करून राज्य सरकार अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता सोमय्या यांनी त्या अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला अंक पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्यापासून सुरु झाला आहे.
नांगरे-पाटील यांनी स्वतःचे प्यादे बनवले!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाणार होतो. मात्र पोलिसांनी आपल्याला घरातच बंदिस्त केले होते. बाहेर पडूच दिले नाही. एका पीएसआय पदाचा अधिकारी इतके धाडस करतोच कसा? याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना माहित नव्हते, असे सांगण्यात आले. मग हा सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यांनी केला हेच स्पष्ट होते. त्यावेळी पोलिस अधिकारी हे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलत होते. त्यावरून मला कोल्हापूरला जाऊ न देणे, त्यासाठी मला घरातच कोंडून ठेवण्याचे कारस्थान विश्वास नांगरे-पाटील यांनी आखले होते, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे विश्वास नांगरे पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी स्वतःचे प्यादे होऊ दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपण केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
(हेही वाचा : भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?)
नांगरे-पाटील चांगले अधिकारी नाहीत!
विश्वास नांगरे-पाटील हे चांगले पोलिस अधिकारी आहेत, असे बोलले जाते, पण मी हे मानत नाही. एखाद्या भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी स्वतःचे प्यादे बनू दिले आहे. त्यामुळे ते चांगले अधिकारी आहेत, असे मी मानत नाही. स्वतःचे प्यादे बनू देणारे जिल्हाधिकारी असो की पोलिस अधिकारी यांना मी माफ करणार नाही. त्यावेळी आपल्याला खोटे आदेश काढून रोखण्याचा प्रयत्न झाला आहे, असेही सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community