T20 World Cup 2024 : रोहित बरोबर सलामीला यशस्वी येणार की, विराट?

T20 World Cup 2024 : ५ जूनला भारतीय संघासमोर एक महत्त्वाचा प्रश्न असेल तो सलामीचा.

105
T20 World Cup 2024 : रोहित बरोबर सलामीला यशस्वी येणार की, विराट?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ ५ जूनला टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) आपला पहिला सामना न्यूयॉर्कच्या रसॉ काऊंटी मैदानात खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्माने अंतिम अकरा जणांच्या संघाविषयी मौन बाळगलं असलं तरी बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात त्याने काही प्रयोग जरुर करून पाहिले आहेत. मुख्य स्पर्धेपूर्वी हा भारताचा एकमेव सराव सामना होता आणि त्यात यशस्वी ऐवजी संजू सॅमसनला संघात घेऊन रोहितने पहिला प्रयोग केला आहे. (T20 World Cup 2024)

याचा एक अर्थ असा की, सलामीला रोहित आणि यशस्वीची डावी-उजवी जोडी असावी अशी कितीही चर्चा असली तरी भारतीय संघ प्रशासन रोहित आणि विराट या अनुभवी जोडीवरच विश्वास दाखवणार असल्याचं दिसतंय. विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून मोठं यश मिळवलं आहे आणि खासकरून पहिल्या पॉवरप्लेमध्ये तो यशस्वी झाला आहे. (T20 World Cup 2024)

अलीकडेच दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित आणि विराटच्या बाजूने कौल दिला आहे. ‘डावी-उजवी जोडी हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. पण, अंतिम अकरा निवडताना खेळाडू आणि त्याचं कौशल्य पाहिलं पाहिजे. हे कौशल्य आणि अनुभव रोहित आणि विराटकडे वादातीत आहे,’ असं सुनील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Lok sabha Election Result 2024: अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर; काय सांगते आकडेवारी ?)

तर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आयपीएल (IPL) पासून रोहित आणि यशस्वी या जोडीची पाठराखण करत आहे. ‘पंधरा जणांचा जो संघ भारताने निवडला आहे, त्यानुसार भारतीय संघ ६ गोलंदाजांनाही खेळवू शकतो. मग अक्षर आणि हार्दिकला खेळवता येईल आणि त्याचवेळी भारतीय संघाकडे (Indian Team) आणखी एक पर्याय आहे तो नेट्समध्ये नियमित गोलंदाजी करणाऱ्या यशस्वीचा. तो पर्याय निवडला तर यशस्वीने रोहितबरोबर सलामीला यावं,’ असं इरफान स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना म्हणाला होता. (T20 World Cup 2024)

त्याचवेळी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकरांशी संवाद साधताना भारतीय आघाडीच्या फळीत अष्टपैलूंची उणीव जाणवत असल्याचं म्हटलं आहे. ‘रोहित, विराट आणि सूर्यकुमार यांच्यामुळे भारतीय आघाडीच्या फळीत अष्टपैलू खेळाडूंसाठी जागाच नाही. भारतीय संघासाठी (Indian Team) हा मोठा कच्चा दुवा आहे,’ असं द्रविड स्पष्टपणे म्हणाले आहेत. पण, हे तीनही खेळाडू ज्येष्ठ आणि फॉर्ममध्ये असलेले आहेत. त्यामुळे हे तिघे संघात असतीलच आणि तसं झालं तर यशस्वीला निदान सुरुवातीच्या सामन्यांत तरी बाहेर बसावं लागणार असं दिसतंय. नाहीतर, गोलंदाज म्हणून त्याची उपयुक्तता त्याला पटवून द्यावी लागेल. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.