-
ऋजुता लुकतुके
भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढता तणाव लक्षात घेऊन बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी दुपारी आयपीएल सध्या आठवडाभरासाठी स्थगित (IPL Suspended) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गुरुवारी रद्द झालेला पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हा सामनाही आता नव्याने खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानचे हल्ले आणि कुरघोडी वाढत असताना राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत बीसीसीआयने (BCCI) आयपीएल थांबवली आहे. शिवाय खेळाडूंची सुरक्षा हा ही महत्त्वाचा मुद्दा होता.
आता आयपीएल स्थगित (IPL Suspended) झाल्यानंतर खेळाडू आपापल्या फ्रँचाईजींना सोडून घरी परतायला सुरुवात झाली आहे. खासकरून पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द झाल्यानंतर खेळाडूंमध्येही घबराहट पसरली होती. भारताने नवी दिल्ली (New Delhi) वगळता, उत्तर भारतातील १० विमानतळं बंद केली आहेत. धरमशाला इथं हा सामना झाला. आणि तिथे जवळची अमृतसर आणि चंदिगड ही दोन्ही विमानतळं बंद आहेत. अशावेळी दोन्ही संघातील खेळाडूही तिथे अडकून पडले होते. त्यांना भारतीय रेल्वेच्या विशेष रेल्वेनं तिथून बाहेर काढण्यात आलं आहे.
(हेही वाचा – India Pak War Update : कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकचा खोट्या दाव्याचा बुरखा टराटरा फाडला; फोटो दाखवत केली पोलखोल)
खासकरून परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या ताफ्यातील परदेशी लोक मायदेशात परतण्याची घाई करत आहेत. आणि त्यांना बीसीसीआय (BCCI) सहकार्य करणार आहे. ‘भविष्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आयपीएलविषयी पुढील निर्णय घेण्यात येईल. स्पर्धा पुन्हा झाली तर खेळाडूंना परत बोलावण्यात येईल. सध्या तरी फ्रँचाईजींना खेळाडूंना मुक्त करण्यास सांगण्यात आलं आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
बीसीसीआय (BCCI) आणि फ्रँचाईजी मालक खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य करणार आहेत. दिल्ली आणि पंजाबचे संघ आधी नवी दिल्लीत पोहोचतील. तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अख्खा संघ आधी अहमदाबादहून मुंबईला येईल. आणि तिथून खेळाडू आपापल्या घरी परततील. बंगळुरू आणि लखनौचे संघ शुक्रवारच्या सामन्यासाठी लखनौ इथं तळ ठोकून होते. ते इथून आपापल्या घरी जातील. सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने तर हैद्राबादमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटाचे पैसे परत द्यायलाही सुरुवात केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community