-
ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्जने यंदा आयपीएल हंगामात जोरदार मुसंडी मारली आहे. १४ पैकी ९ सामने जिंकत त्यांनी पहिल्या दोन संघांमध्ये आपलं नाव पक्कं केलं आहे. अतिशय शिस्तबद्ध कामगिरी करत त्यांनी मुंबई इंडियन्सना सोमवारी ७ गडी राखून आरामात हरवलं आणि ही कामगिरी केली. मुंबईचा उधळलेला वारू त्यांनी अशा पद्धतीने रोखला. संघाच्या या कामगिरीनंतर महत्त्वाचा फलंदाज शशांक सिंगने या कामगिरीचं श्रेय संघात पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला दिलं आहे. (IPL 2025, PBKS in Top 2)
(हेही वाचा – IPL 2025, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा, ऑन-एअर झाला मोठा वाद)
‘अगदी पहिल्या दिवसापासून पाँटिंग आणि श्रेयस यांनी आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये एक गोष्ट सांगितली. ते संघातील सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू यजुवेंद्र चहल आणि संघाचा बसचालक यांना एकाच प्रकारची वागणूक देणार आहेत. ही गोष्ट त्यांनी आतापर्यंत पाळली आहे. या गोष्टीमुळे संघ म्हणून आम्ही एकत्र आलो,’ असं शशांक सिंगने मुंबई इंडियन्स विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर पत्रकाराशी बोलताना सांगितलं. शशांकने पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करत पंजाबच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आता रिकी पाँटिंगचं त्याने विशेष कौतुक केलं. ‘मी आतापर्यंत खेळलेल्या मुख्य प्रशिक्षकांमध्ये ब्रायन लारा आणि रिकी पाँटिंग या दोन खेळाडूंचं नाव मी आदराने घेईन. रिकी पाँटिंग सरांनी तर माझ्यावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे. त्यांनी फक्त आमचा दृष्टिकोन बदलला नाही, तर आमच्यात विश्वास जागा केला. संघ म्हणून कायम आम्ही एकत्र असू हे पाहिलं,’ असं शशांक म्हणाला. (IPL 2025, PBKS in Top 2)
(हेही वाचा – कोल्हापुरात राजकीय भूकंप! Rajesh Kshirsagar यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत केला ‘हा’ दावा)
पंजाब किंग्जचा संघ आता पहिल्या दोन संघांत आहे. अंतिम फेरीत प्रवेशासाठी त्यांना आता दोन संधी मिळणार आहेत. शशांक आणि श्रेयस अय्यर हे जुने मित्र आहेत. श्रेयसच्या कप्तानीखाली खेळण्याचा अनुभवही शशांकने यावेळी सांगितील. ‘मी श्रेयसला १०-१५ वर्षं ओळखतो. पण, संघात त्याच्या कप्तानीखाली खेळण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. तो खूप चांगला अनुभव होता. तो सगळ्यांना त्यांच्या पद्धतीने खेळण्याची मुभा देतो. तो सगळ्यांचं ऐकून घेतो. माझ्यासाठी तो कप्तान असणं खूपच पथ्यावर पडलं आहे,’ असं शशांक म्हणाला. मंगळवारी या हंगामातील शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान होणार आहे. त्यानंतर पहिल्या चार संघांमधील क्रमवारी निश्चित होईल. पहिला पात्रता सामना गुरुवारी मुल्लनपूर इथं होणार आहे. (IPL 2025, PBKS in Top 2)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community