IND Vs WI 2nd T20 : विंडिजची भारतावर दोन विकेटनी मात, मालिकेतही 2-0 ने आघाडी

पाच सामन्यांच्या मालिकेत विंडीजने २-० अशी आघाडी घेतली आहे.

88
IND Vs WI 2nd T20 : विंडिजची भारतावर दोन विकेटनी मात, मालिकेतही 2-0 ने आघाडी

ऋजुता लुकतुके

विंडीज (IND Vs WI 2nd T20) तडाखेबंद फलंदाज निकोलस पुरनने 40 चेंडूत 67 धावा फटकावत संघाला सात चेंडू राखून विजय मिळवून दिला. पुरनने कर्णधार रोव्हमन पॉवेलसह केलेली 50 धावांची भागिदारी निर्णायक ठरली. कारण, त्यापूर्वी भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी पहिल्या तीन षटकांत विंडीज संघाची अवस्था 3 बाद 32 अशी केली होती.

ब्रँडन किंग (0) आणि जॉनसन चार्ल्स (2) झटपट बाद झाले. पण, त्यानंतर पुरनने खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. आधी काईल मेअर्स (15) बरोबर त्याने पडझड रोखली आणि पुढे कर्णधार पॉवेलसह (21) डावाला आकार दिला. शिमरॉन हेटमेअरची (22) साथही त्याला लाभली.

निकोलस पुरनने 40 चेंडूत 67 धावा करताना 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. शेवटी मुकेश कुमारच्या चेंडूवर यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर रोमारिओ शेफर्ड आणि जेसन होल्डरही बाद झाले. त्यामुळे भारतीय विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण, निर्णायक क्षणी मुकेश कुमारकडे चेंडू देण्याचा हार्दिक पांड्याचा अंदाज चुकला.

(हेही वाचा – जयंत पाटील-अमित शाह यांच्यातील कथित भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया)

19व्या षटकात मुकेशच्या चेंडूवर अलगड षटकार ठोकत अलझारी जोसेफने विंडीजला विजय मिळवून दिला.

भारतातर्फे हार्दिक पांड्याने 35 धावा देत 3 बळी मिळवले. तर यदुवेंद्र चहलने 19 धावांमध्ये 2 बळी मिळवले. पण, चहलची चार षटकं पांड्याने पूर्ण केली नाहीत.

त्यापूर्वी भारतीय संघाने दीडशतकी मजल मारली ती तिलक शर्माच्या ५१ धावांच्या जोरावर. सलामीवीर शुभमन गिल (७) आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादव (1) अपयशी ठरले. त्यानंतर इशान किशन (21) च्या मदतीने तिलक शर्माने डाव सावरला.

पण, तिलकला इतर फलंदाजींनी आवश्यक साथ दिली नाही. त्यामुळे 150 चा पल्ला गाठायलाच संघाला कष्ट पडले. हार्दिक पांड्या (24) तर अक्षर पटेलने (14) निदान दुहेरी धावसंख्या गाठली.

थोडक्यात एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच फंलदाजीतील अपयश भारतीय संघाच्या मूळावर उठलं. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्‌या यांची फलंदाजी म्हणावी तशी बहरलेली नाही. तसंच खासकरून टी-20 सामन्यांमध्ये संघाला गरज असते ती अष्टपैलू खेळाडूंची. गोलंदाजी करतील आणि पाचव्या-सहाव्या क्रमांकावर तडाखेबंद फलंदाजी करतील असा खेळाडू संघाला हवा आहे. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलचा अपवाद सोडला तर असा खेळाडू सध्या संघात दिसत नाही.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.