Ind vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणार अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज 

भारताचा युवा गोलंदाज अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच बळी टिपले

147
Ind vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणार अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज 
Ind vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणार अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज 

ऋजुता लुकतुके

पंजाबचा युवा तेज गोलंदाज अर्शदीप भारताचा उगवता खेळाडू म्हणून ओळखला जातो. रणजी आणि अगदी आयपीएलमध्येही त्याची कामगिरी पाहून बीसीसीआय आणि निवड समितीचा विश्वास त्याने जिंकला आहे. पण, आंतरराष्ट्रीय कामगिरी म्हणाल तर पहिल्या चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने एकही बळी मिळवला नव्हता. कर्णधाराने कधी दहा षटकंही त्याला पूर्ण करू दिली नाही.

पण, अधून मधून तो चांगलीच चुणूक दाखवून द्यायचा. जसं ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात बंगळुरूमध्ये त्याने पहिल्या दोन षटकांत धावा दिल्या. पण, गरज असताना सामन्याचं शेवटंच षटक फक्त एकच धाव दिली. आणि भारताला विजय शक्य झाला. दक्षिण आफ्रिकेतही टी-२० मालिकेत त्याची गोलंदाजी चांगली होत होती.

आणि मजल दरमजल करत त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सुधारत गेली. आता जोहानसबर्गच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर तर टी-२० विश्वचषकासाठी संघात जागा भक्कम केल्याचं जाणकार बोलू लागले आहेत. सामन्यागणिक आपल्या खेळात सुधारणा करत आणि संघातील ज्येष्ठांचा सल्ला घेत  अर्शदीपने ही मजल मारली आहे.

(हेही वाचा-CM Eknath Shinde धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला ; समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव)

जोहानसबर्गमध्ये खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणार असं वाटत असतानाच पहिल्या षटकापासून अर्शदीपने चांगली लय पकडली. आणि अखेर आपल्या पहिल्या ५ गडी बाद करण्याच्या कामगिरीला गवसणी घातली. अर्शदीपला स्वत:ला विश्वास देणारी ही खेळी आहे.

आपल्या दहाव्या षटकात त्याने पाचवा बळी टिपला. आणि त्यानंतर तो कुठल्यातरी भारतीय खेळाडूला हिंदीत विचारत होता, ‘हा चेंडू (ज्याने पाचवा बळी मिळवून दिला) मी माझ्याकडे ठेऊ शकतो का, विचारना पंचांना तसं!’ सामना संपल्यावर त्याला तो चेंडू मिळालाही असेल.

अर्शदीपचं वैशिष्ट्य हे की, जोहानसबर्गच्या खेळपट्टीवर त्याला चेंडूचा टप्पा अचूक सापडला. आणि फलंदाजांना क्रीझमध्ये जखडून ठेवत त्याने बळी मिळवले. जम बसवलेल्या खेळाडूंनाही चकवलं. हेन्रिक्स, क्लासेन, डी झोजरी, व्हॅन देअर ड्युसेन या पहिल्या चार फलंदाजांना त्याने तंबूत पाठवलं. आणि कर्णधार राहुलने पाच गडी पूर्ण व्हावेत म्हणून त्याला सलग गोलंदाजी दिल्यानंतरही न थकता त्याने नेटाने गोलंदाजी करत जम बसलेल्या फेलुकवोयालाही बाद केलं.

जोहानसबर्गच्या मैदानावर सीमारेषा जवळ आहे. त्यामुळे फलंदाज इथं षटकार वसूल करतात. आणि पूर्वी ४३० धावांचा पाठलागही इथं झालेला आहे. त्यामुळे सामना जिंकल्यावर अर्शदीपचाही त्याच्या कामगिरीवर विश्वास बसत नव्हता. ‘दक्षिण आफ्रिका पहिली फलंदाजी करणार म्हटल्यावर आमची व्यूहरचना होती की, त्यांना ४०० चा टप्पा गाठू द्यायचा नाही. फलंदाजांना कसं रोखायचं हे आम्ही ठरवत होतो. पण, फुल लेंग्थ चेंडू त्यांना अडचणीत आणतायत हे कळल्यावर मी टप्पा अचूक पकडला. आणि फलंदाज बाद होत गेले,’ असं अर्शदीपने प्रामाणिकपणे सांगितलं.

या कामगिरीने अर्शदीपने आधी एकाही भारतीय गोलंदाजाला न जमलेली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ५ बळी टिपणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आशीष नेहराने ती कामगिरी केली आहे. पण, ती विश्वचषक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.