भारतीय महिला तिरंदाजी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ कम्पाऊंड प्रकारात पटकावले सुवर्ण पदक

भारतीय संघाला या स्पर्धेत मिळालेलं हे पहिलं वहिलं सुवर्ण आहे

142
भारतीय महिला तिरंदाजी संघाची ऐतिहासिक कामगिरी, 'या' कम्पाऊंड प्रकारात पटकावले सुवर्ण पदक
भारतीय महिला तिरंदाजी संघाची ऐतिहासिक कामगिरी, 'या' कम्पाऊंड प्रकारात पटकावले सुवर्ण पदक

भारतीय महिला तिरंदाजी (India’s Women’s Archery Team) संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Archery Championships 2023) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्योती सुरेखा वेन्नम (Surekha Vennam), अदिती स्वामी (Aditi Swami) आणि परनीत कौर (Parneet Kaur) यांच्या चमूनं कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय संघाला या स्पर्धेत मिळालेलं हे पहिलं वहिलं सुवर्ण आहे. भारतीय संघाची अंतिम फेरीत गाठ होती मेक्सिकोच्या अनुभवी संघाशी. पण, मेक्सिकोला त्यांनी २३५ विरुद्ध २२९ गुणांनी मात दिली. अंतिम फेरीपर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघाचं सगळीकडे कौतुक होत आहे.

भारतीय महिलांनी स्पर्धेत तगडी कामगिरी करताना कोलंबिया आणि चायनीज तैपेई या बलाढ्य संघांचा पराभव केला. अंतिम सामन्यात अनुभवी ज्योती आणि नवोदित अदिती तसंच परनीत यांनी एकदाही आघाडी गमावली नाही. उलट तब्बल १९ वेळा पूर्ण म्हणजे १० गुण वसूल केले. पहिल्या तीन सेट्समध्ये भारतीय संघाचंच वर्चस्व राहिलं. आणि त्यामुळे विजय सुकर झाला. या भारतीय संघाला इटलीचे माजी जगज्जेते सर्जिओ पाग्नी यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. कम्पाऊंड तिरंदाजी प्रकारात ६-६ सेट्सचा सामना असतो. आणि प्रत्येक संघाने सेटमध्ये ६ वेळा लक्ष्य भेद करायचा असतो. त्यासाठी सर्वाधिक ६० गुण मिळतात. आणि एका भेदासाठी सर्वाधिक १० गुण मिळतात. असे १० गुण मिळवण्याची किमया भारतीय संघाने १९ वेळा केली.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर पुन्हा चिघळले; ३ ठार, गेल्या २४ तासांपासून गोळीबार सुरुच)

या भारतीय संघातील अदिती स्वामी ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातली आहे. आणि तिचं वय आहे जेमतेम १७ वर्षांचं. अलीकडेच ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद मिळवून ती सीनिअर गटात खेळायला लागली आहे. कालच्या विजेतेपदानंतर अदिती खुश होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही फक्त आमच्याच कामगिरीवर लक्ष दिलं. प्रतिस्पर्धी कसा लक्ष्यभेद करतायत याकडे आमचं लक्ष नव्हतं. त्यामुळे स्वतसाठी आम्ही उद्दिष्टं ठरवत गेलो. आणि हे यश मिळालं.” तर अनुभवी ज्योती वेन्नामही या विजेतेपदानंतर खुश होती.

“देशाचा जागतिक स्पर्धेतला सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपला याचा जास्त अभिमान वाटतो,” असं ती म्हणाली. “सध्या तरी आम्ही सुवर्ण जिंकलं यावर विश्वासच बसत नाही आहे. पण, स्टेडिअमवर जोरदार वारे वाहत असताना आमची अचूकता कमी झाली नव्हती. त्यामुळे अंतिम फेरीतही चांगल्याच कामगिरीचा विश्वास होता. त्यात सुवर्ण मिळालं हे सोन्याहून पिवळं झालं. आता इथंच थांबायचं नाही तर ऑलिम्पिक पर्यंत पोहोचायचं आहे,” या शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत. विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने ९ रौप्य तसंच २ कांस्य पदकं जिंकली होती. पण, यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यात महिला संघ यशस्वी झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.