-
डॉ. केतन जोगळेकर
‘सूर्याला स्वतःमधल्या दैदीप्यमान प्रकाशाचा दुसऱ्या कोणाकडूनही दाखला लागत नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरही (Veer Savarkar) तसेच क्रांतिसूर्य… अनादी, अनंत, अवध्य!’ स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर विचारवंत, राष्ट्रनिष्ठ तत्वज्ञ आणि सामाजिक सुधारक होते. त्यांच्या विचारांमध्ये दूरदृष्टी, विज्ञाननिष्ठा आणि राष्ट्रहित यांचा समतोल होता. आजच्या भारतात, विशेषतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, सावरकरांचे हेच विचार नव्या स्वरूपात प्रकट होत आहेत. मोदी हे केवळ प्रशासक नसून, एका व्यापक वैचारिक आंदोलनाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या अर्थनीती, विदेशनीती आणि मूल्यनीती या तिन्ही प्रमुख धोरणांमध्ये सावरकरांच्या विचारांचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसतो.
अर्थनीती
स्वावलंबन, स्वदेशी आणि समता स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी ब्रिटिश शोषणाच्या विरोधात उभे राहत स्वदेशी अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला होता. त्यांची अर्थनीती ही आत्मनिर्भरतेवर आधारित होती. त्यांनी शेती, कुटीर उद्योग, यांत्रिकीकरण आणि विज्ञाननिष्ठ औद्योगिक विकासावर भर दिला. त्यांचा भर आर्थिक समतेवर होता, ते भांडवलशाहीचे अंध समर्थक नव्हते, तर साम्यवादी विचारांनाही विरोध करत होते. मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमात वीर सावरकरांची ही अर्थदृष्टी प्रकर्षाने जाणवते. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या योजना देशांतर्गत उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकतेला चालना देतात. गरीब, महिला, शेतकरी, तरुणांसाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, पीएम किसान, आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांद्वारे आर्थिक समावेशन घडवण्याचा प्रयत्न होतो.
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Top 2 : ‘चहल आणि बसचालकाला आम्ही संघात सारखंच वागवतो,’ – शशांक सिंग)
विदेशनीती
राष्ट्रहित व सामरिक सक्षमता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) स्पष्ट मांडली होती की, विदेशनीती भावनांवर नव्हे, तर राष्ट्रहितावर आधारित असावी. त्यांनी भारतासाठी मजबूत लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचे महत्त्व अधोरेखित केले. सामरिक सज्जता, जागतिक व्यासपीठावर भारताची प्रभावी उपस्थिती आणि स्वाभिमान राखणे हे त्यांचे विदेशनीतीचे स्तंभ होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशनीतीतही राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राईक यांद्वारे भारताच्या आत्मरक्षणक्षमतेचा परिचय दिला गेला. ‘नेबरहूड फर्स्ट’, ‘एक्ट ईस्ट’, आणि ‘ग्लोबल साउथ’ सारख्या धोरणांनी भारताचा जागतिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न झाला. वीर सावरकरांनी जसे जागतिक व्यूहनीतीचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच मोदींनी भारताला एक आत्मविश्वासू आणि सामरिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर उभे केले आहे.
(हेही वाचा – दापोली नगरपंचायतीत सत्तांतराचा स्फोट! Yogesh Kadam यांची रणनीती यशस्वी; कृपा घाग नगराध्यक्षपदी जवळपास निश्चित)
मूल्यनीती
राष्ट्रवाद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक समता, सावरकरांचे (Veer Savarkar) हिंदुत्व हे धार्मिक नसून सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित होते. त्यांच्या मते, भारत ही केवळ भौगोलिक भूमी नसून एक पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर उभारणी, कलम ३७० रद्द करणे आणि समान नागरी कायदा या निर्णयांनी वीर सावरकरांच्या राष्ट्रवादाला बळकटी दिली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेमध्ये सावरकरांच्या समावेशक राष्ट्रनिर्मितीची छाया स्पष्टपणे दिसते. स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमधून सामाजिक सुधारणांचा वेध घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमध्ये सावरकरांचे प्रतिबिंब हे केवळ राजकीय नव्हे तर वैचारिक स्तरावरही दिसते. त्यांच्या अर्थनीतीत स्वावलंबन, विदेशनीतीत सामरिक परिपक्वता आणि मूल्यनीतीत सांस्कृतिक आत्मभान दिसते. क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ज्वलंत प्रकाश आज नवभारताच्या वाटचालीला प्रेरणा देतो आहे. त्यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारधारेचं तेज आधुनिक भारताच्या निर्णयप्रक्रियेत प्रतिबिंबित होत आहे.
(लेखक सनदी लेखापाल आणि बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community