Veer Savarkar : मित्र मेळ्यातील सावरकरांचे भगूर, नाशिकचे सहकारी

भगूर गावचे प्रेम केवढे विनायकावरती ! जणू अयोध्या नगर वासी भाळले श्रीरामावरती !!

49

–  विरेन्द्र ल. देशपांडे

धन्य गाव ते धन्य लोक ते त्या गावामधले
इतिहासातील गांव जयाचे अजरामर झाले”
दिनांक 28 मे हा वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जन्मदिवस. त्या निमित्याने त्यांच्यावर स्फूट लेखन करावं असा मनी मानसी विचार होताचनेमकं काय लिहणार….. ? कारण वीर सावरकर शतपैलू व्यक्तीत्व अनेकानेक बिरुदालीने सुप्रसिध्द. साहीत्य क्षेत्रात विविधतने नटलेले, बहरलेले सावरकर यांचा बालपणीचा लोकसंग्रह मित्रमेळा, बालमेळावा मित्रपरीवार ख-या अर्टी लिहण्यासारखं. त्यांचे कार्य कर्तृत्व, गुण गौरवाची अल्पशी का असेना नोंद व्हावी म्हणून सावरकर नि त्योंचे भगूर, नाशिक चे सहकारी हा विषय मुद्दाम साकारण्याचा विचार निवडला. तेव्हा अफाट अशी ही सारी मंडळी दृष्टी समोर आली जेव्हा कुणी समोर जातो तेव्हा मागे कुणीतरी असतो. छत्रपती शिवरायांचे मागे मावळे होतेच नां……. तसेच सावरकरांच्या मागे ही सारी मावळे मंडळी मित्रमेळ्याची तशीच ‘अभिनव भारताची’ हे विसरून कसे चालेल बरं. सावरकरांनी आपल्या वागणूक, वर्तणूक स्नेहाने मिळविलेली ही देशोहितार्थ, राष्ट्रहितार्था करिता उभी केलेली प्रभावळ तीचेही तेवढेच महत्व नि अस्तित्व मान्य कराव लागतं, नव्हें मान्यता प्राप्त नोंद इतिहासात घेतली आहे. त्यातील काही स्मरणातील मोती देशउध्दारक, राष्ट्र कार्याकरिता, मित्र मेळया करिता समर्पित झाले. वी सावरकरांच्या (Veer Savarkar) अग्नीपथावर त्यांनीही ऊघडपणे, प्रकटपणे आपले पाय पोळून घेतलेत्र ती मित्रमिळ्याची शपथच तशी होती. नावे तरी किती सांगावी श्री म्हसकर, श्री रावजी पागे, श्री सखारामपंत गोरे, विष्णु महादेव भट, श्रीधर वर्तक, नत्थू, भिकू, बर्वे, बाळू रावजी बापू, त्रयंबक वर्तक, गंगाराम, रामभाऊ दातार बन्धू, गणपत न्हावी, काशिनाथ र्वैशंपायन, गोविंद देसाई, दाते, नाना वर्तक, अनंत बर्वे, शंकर वाघ, परशूराम शिंपी, राजाराम शिंपी, गोपाल देसाई आठल्ये, खाडे बन्धू, सरोदे, शंकर गोसावी, धल्लाप्पा चिवडेवाला, देवीसिंग परदेशी, खुशाल सिंग, गणपत मगर, मायदेव, घनश्याम चिपळूणकर, जसवंत बन्धू, बाबाराव सावरकर, दामोदर चंद्रात्रे, कृष्णाजी महाबळ, दुगूल, गोगटे, रामभाऊ भाटे, मुकूंद मोये, देशपांडे, सोमण, दांडेकर, व्यंकटेश नागपूरकर, त्रिंबक देशपांडे, वि.ना. देशपांडे, वि.ग. केळकर, कृष्णाजी खरे, वामन नारायण जोशी, बाळकृष्ण मराठे, गंगाधर चितळे, भास्कर रामचंद्र खरे, गणेश बावाजी काथे, महादेव गाडगीळ, विठ्ठल बाळकृष्ण जोशी, वासुदेव आठल्ये, त्र्यंबक कृष्ण बुरकूले, जोगळेकर, विष्णुशास्त्री केळकर, वामन दातार, आबा दरेकर (कवी गोविंद) नाना गोखले, नाशिकचे घाणेकर, औंधचे हिंगे, राव बहादूर वैद्य, कवि पारख, बापूराव केतकर, अण्णा पट्टेकर या सा-यांनी सावरकरंवर श्रध्दा, भक्ती, निष्ठा समर्पित केली होती. काही दहा पाच सहकारी सावरकरांहून वडील होते. त्यांनी देखील सर्वपरिने, सर्वदृष्टीने आपला भक्तीभाव अर्पित करून परिपूर्ण भूमिका निभावली. या सा-यांची साथ सोबत सहकार्याने काही कायमचे सहकारी झालेत, तर काहींनी आपआपल्या परीने देशसेवा, राष्ट्रसेवा केली. अनेक सहका-यांनी देशहितार्थ, स्वातंत्र्याकरिता अमानूष छळ, शिक्षा, कारागृह, त्रास सहन केला. मित्रमेळ्याच ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य हेच राजकीय ध्येय होतं. सावरकरांनी सर्व सहका-यांच्या गळी उतरवलं होते. या ध्येयानेच सारे भारावले होते वयाने वडील असलेल्यांनी तर सावरकर म्हणेल ते ब्रम्हवाक्य हेच समिकरण सूत्र अंगिकारले होते. अशी भक्ती. मित्रमेळयाचे गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवात दिसून येत असे. नाना वर्तक हा सहकारी मिरवणूकी मधे वयस्क माणसाप्रमाणे डोक्यावर पागोटे घालून मिरवणूकीत पुढे पुढे चालण्याचा मान अतिशय ममत्वपूर्वक करीत असे. आबा दरेकर तर आपल्या काव्यातून मेळया करिता पदे लिहीत सारे सहकारी त्याचे गायन करित मिळमेळ्याची आन बान शान नाशिकरांना थक्क करित. त्या रणघोषणा, ते काव्य गायन या बाल गोपालांचे बघून भारी कौतूक वाटे.
,,
मित्रमेळ्याच्या अगोदर कधी ” स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही जय सीता लक्ष्मी म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मी. सहका-यांनी पुजा बांधुन देशकार्याची प्रथम ‘राष्ट्रभक्त समूह’ संस्थेचा घोषणा कुणी केलेली दिसत नाही. त्या स्वातंत्र्य लक्ष्मीची वरिल सर्व शपथ घेतली. सारेच बालसवंगडी.

स्वभाषा, सांकेतिक शब्द ‘रामहरी’ शब्दानं एकमेकांना अभिवादन करीत नि त्याच शब्दाने संभाषण करायचे जसे रामहरी भेटला, आज रामहरी असे म्हणाला, रामहरी दोन दिवसांनी येणार आहे, रामहरीची सध्या प्रकृती बरी नाही वगैरे. मित्रमेळ्याच्या बैठकीत अनेक विषय हाताळल्या जात. साहित्य, व्यापार, इतिहास, व्यायाम, वेदांत, गोरक्षण वगैरे परंतू प्रामुख्याने स्वदेश स्वातंन्य हाच अमूचा राजकीय धर्म, स्वदेश स्वातंत्र्य हीच आमूची राष्ट्रीय देवता, आमचा राजकीय देव. ध्येय जर संपूर्ण स्वातंत्र तर अर्थातनच त्या करिता साधना सशस्त्र क्रांती हे सुत्र सर्वानी अंगिकारलं होतं. मित्रमेळयाचा व्याप हळूहळू वाढू लागला तेव्हा आजू बाजूच्या गाव खेडयात त्यांच्या शाखा निघू लागल्या प्रथम भगूर, नाशिक, त्रिंबकेश्वर, कोठूकूर पुणे आदी स्थळी विस्तारल्या.

सावरकरांचे सहकारी श्री. शंकर वाघ त्यांची तात्यारावांवर देवाप्रमाणे निष्ठा. तो अतिशय साहसी कर्ता नि हौसी मित्रमेळ्याच्या चळवळीत स्वातंत्र्याकरिता अत्यंत विश्वासान काम कार्य करीत. मित्रमेळाचा मोठा अभिमानी, झटून मेहनत करण्यास कधी मागे न राहणारा. त्याचे वाचन, पठन ही सावरकरांच्या देखरेखी खाली झाले. कालांतराने तो बडोदयास राजवाडयात गायकवाडाचा न्हावी झाला. पुढे चालुन बडोदयास अभिनव भारत मंडळीचा इंग्रजी सत्तेने जेव्हा पाठलाग न धरपकड चालविली तेव्हा सुदैवाने तो बचावला. परंतू राहत्या घराला आग लागून तो आगीतच जाळल्याचे दुःखद वृत्त सावरकरांच्या कानावर आदळले. तेव्हा तात्याराव सावरकर म्हणले स्वदेश स्वातंत्र्यासाठी काही काळ तरी मनःपूर्वक झटणा-या देशभक्त तरूणाच्या नि मा – -इया एका निस्सीम भक्ताचा असा शेवट झाला. राष्ट्रोपयोगी पडलेल्यात शंकर वाघ ची गणना केली पाहिजे. श्री म्हसकर हे सावरकरांचे अगदी प्रथम पासूनचे एकनिष्ठ सहकारी, वयात वडील सरकारी नौकरीतले. ‘राष्ट्रभक्त समूहा’ पासून तर मिळमेळयापर्यंचे अतिशय विश्वासातले. मेळयाचा व्याप नि छाप नाशिककरांवर पडत असताच 1901 मधे श्री म्हसकर प्लेगने एकाऐकी वारले. म्हसकर म्हणजे एक प्लेग कवचच अशी त्यांची ख्याती होती. वर्षानुवर्ष त्यांनी प्लेगच्या रोग्यांत दिवसरात्र काम केले. प्लेग जणू काही अंगवळणी पडल्यासारखा. अखेर त्यांना भ्रम पडला त्या भ्रमात ते इंग्रजांशी लढाया खेळू लागले स्वातंन्त्र्य लक्ष्मीचा जयघोष कारत धावपळ करीत. सावरकर म्हसकरां संबंधी लिहतात इंग्रजांशी लढून स्वदेश स्वातंत्र्याच्या प्रत्यक्ष समरात मारीत मारीत मरणाची त्यांची हाव निदान त्यांच्या पूरती तरी त्यांनी पुरवुन घेतली. त्यांनी घेतलेली शपथ पाळली आणि परशत्रूशी लढत त्यांनी देशस्वातंत्र्यार्थ प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्याच्या ध्यासातच, देह ठेवला. त्यांच्या मते खरोखरच ते स्वातंत्र्य समरात वीरगती पावले. अंते मितःसा गतिः असे म्हणतात कुणी सांगावे. तशा झुंझार स्वातंत्र्यवीरांच्या जन्मास ते गेले नसतील म्हणून. एकनिष्ठ हेच स्वातंत्र्य संग्रामातले तुलसीपत्र. एवढयासाठी देखील महाराष्ट्राने या अज्ञान पण थोर देशभक्तीच्या स्मृतीस कृतज्ञतेच्या एखाद दूस-या अश्रूने तरी केव्हा केव्हा अभिषेकावे.

भगूरचा बालसवंगडी सहकारी राजाराम शिंपी तात्यारावांवरची भक्ती काय सांगून जातेय बघा, राजाराम व परशूराम शिंपी भगूर च्या बाजारात (मंगळवार) बीडी काडी, घासलेट चे दुकान लावीत त्यातून ते रेवडी घेत प्रथम तात्यांच्या मुखी घातल्याशिवाय खात नसे. त्या काळी जातीवादाचा भार स्तोम ब्राम्हण विटाळला वगेरे परंतू तात्यारावांना त्याही बालबयात न पटणारं जाती भेदाचा तिरस्कार, तिटकारा तेव्हां सावरकरांनी श्लोक रचना तो असा.नित्य तूम्ही प्रभूपाशी प्रेम बर्फी खवा खावा !
तरी म्या ऐके दिवशी रेवडीचा स्वाद का न चाखवा !!
ज्यावेळी तात्यांनी भगूर सोडले तेव्हा सावरकर (Veer Savarkar) कुटूंबियांचे त्यांनी छायाचित्र काढून घेतले ते छायाचित्राच्या साहयाने तात्या राजाराम जवळ सदैव राहिले. ते छायाचित्र पुढे सरकारच्या रोषाला बळी पडणार या भयाने राजारामने पोथीत घालून वर खाली लाकडी फळयात लपेटून चौदा वर्ष गंधफूल वाहत ठेवले. भक्ती भावे पुजा करणा-या राजारामची श्री सावरकरांवरचे मित्र प्रेम, मित्र भक्ती ! ते तात्याचे छायाचित्र तात्याराव सुटून आल्यावर राजारामने ती छायाचित्राची भेट दाखविताच नविन प्रत काढून देणार ही माझ्या पुजेची प्रत आहे. दुर्देवाने आज अगदी बालवयातले सावरकरांचे छायाचित्र उपलब्ध नाही. राजाराम सारखाच बालमित्र गोपाल देसाई हा तर क्रांती कार्यात लाभलेला सहकारी. मित्रमेळ्याच्या शपथा घेवूनच राष्ट्रभक्त समूहात समाविष्ट झाल्याने मित्रमेळा हीच गुप्त संस्था होत तोती तरी नवीन सभासदासाठी ‘किशोर मंडळा’ ची शाखा त्यांचे दुसरे नाव ‘मित्र समाज’ उघडल्यात आली त्याचे चालकत्व श्री नारायण सावरकर (बाळ), श्रीधर वर्तक, दत्तू केतकर यांच्यावर सोपविली. त्याच किशोर मंडळात नारायण सावरकरांच्याच वयाचे कृष्णाजी कर्वे सहभागी झाले. देशोउध्दाराचे, राष्ट्रोपयोगी, देशवीरत्वाचे बाळकडू प्याला. पुढे चालू अभिनव भारतच्या क्रांतीकार्याशी जुळला नि जॅक्सन कटात गोवल्या जावून फासांवर चढला.

त्र्यंबक शाखेचा सहकारी महादेव फडके, अभिनव भारत संस्थेतून नि इतर यथाशक्ती प्रमाणे बरेच सार्वजनिक कार्य करीत असे. त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेरली नि धाडसी कार्यक्रमात सहकारी झाला. या सा-यांत अधिक एक नाव ऊल्लेखनिय ते म्हणजे श्री विष्णू महादेव भट (वि.म.भट) यांचे हे सावरकरांचे दूरचे मावस भाऊ परंतू त्या नात्यापेक्षा ही स्नेहानेच जवळचे सहकारी झाले नि सदैव राहिलेत. एकजीव, एकनिष्ठ. त्यांची त्यांची नि सावरकरांची प्रथम भेट 1901 मध्ये सावरकरांच्या विवाहातच झाली. त्यांचे टोपण नांव ‘भाऊ’ हे सावरकरांनीच ठेवले नि सावरकर म्हणतात ‘भाऊ’ पुढे तेच नाव घरदारी मित्रमंडळीत रूढ झाले. (वि.म.भट) हा माझा चौथा भाऊच झाला. मित्रमेळयात त्यांचा प्रवेश झाला नि अगदी अल्पावधीतच आमची दोघांची मने इतकी एकजीव झाली, निष्कपट ममत्वाचे. आमचे स्वभावही परस्परांशी इतके तद्रुप झाले की 1901 पासून तर 1906 लंडनला गेल्यामुळे आम्ही एकमेकां पासून दूर होईस्तो भाऊसारखा कौटुंबीक वा सार्वजनिक सुख दुःखात नि कर्तव्यात माझा प्रमुख सहभागी नि सहकारी एकनिष्ठ अनुयायी, अभिन्न हृदय स्नेही शेकडो स्नेहात नि अनूयायात कुणी नसे. सावरकर पुढे लिहतात आम्ही राज एकत्र, जेवू एकत्र, अभ्यास एकत्र, वाचू एकत्र, एवढेच काय वेष देखील आम्ही एकसारखे घालीत असे. भाऊ सावरकरांना गुरू मानत, पालक मानत ते विष्णू महादेव भट म्हणजेच भाऊ आपल्या ज्ञानाने, वक्तृत्वाने नि सदैव तत्परतने मित्रमेळा संस्थेचे एक विश्वासू प्रामाणिक, धीर नि धूरंधर असा नेता गणल्या जावू लागला. त्यांच्या कडूनच अनेक प्रकारचे इतिहास सावरकरांनी वाचून घेतले. पुढे अनेक संकटांना तोंड भाऊंनी दिले नि त्याचे भीषण परिणाम मोठया धैर्याने सोसले.

श्री आठल्ये हे एक सहकारी भगूरचे. प्रबल नि सबल असे. मित्रमेळयावर जिवलग प्रेम करणारे हे पुढे अभिनव भारतावर ब्रिटिशांनी शस्त्र उपसल्यावर साताराच्या अभिनव भारताची शाखा काढण्यासाठी श्री आठल्ये वर खटला होवून कांतीकारक कटास्तव शिक्षा ही झाली.

भाग्यवान हो भगूर गांव हे नाशिक शेजारी !
तेथे जन्मले प्रभू सावरकर हिन्दू कैवारी !!
भगूर सारख्या भाग्यवान गावात सावरकर जन्मले. त्यांचे सहकारी ही तिथले पांच सात जण सोडले तर ही सारी मंडळी उनाड, उनाडकी हाच त्यांचा स्थायी भाव “उनाडकीच टोळक” म्हणूनच तीळभांडेश्वर बोळीत प्रसिध्द पावलेलं ‘ वेताळ भांडेश्वर’ त्या बोळीच नाव कुचेष्टेने संबोधिल्या जाई. या सा-या मंडळी मधे ऊनाडक्या, चैनबाजी करित असले तरी एक गोष्ट वाखाडण्यासारखी. लहर आली की परोपकाराची कामेही त्याच एकजूटीने नि चिकाटीने करित. जसे विपत्तीत साहय करणे, कुण्या अनाथाचे रक्षण करणे, काही कुठे आग वगैरे लागली तर जिवापलिकडील धडपड, धावपळ करी. वैयक्तिक परोपकारांची कामे ही करत. आबा दरेकर तर त्या बोळीतलू जणू काही अनेकाच्या घरचे जागते कुलूपच !
या संपूर्ण ध्येय वेडया सहका-यापैकी श्री सखारामपंत गोरे वर लिहल्यावाचून मित्रमेळ्याची खरीख कळायची नाही. हे सखारामपंत अतिशय चैनी, खटयाळ, धीट, मॅट्रिक परिक्षेत वर्गातील विद्यार्थ्यात सर्वात अधिक वेळा नापास होण्याचा मान त्यांचाच.

डोळ्याने थोडे तिरसे सावरकरांच्या संपर्कात येताच मित्रमेळयाची शपथ घेतली असेली तरी बैठकीचे गांभीर्य नसतं, तेथेही बेशिस्तपणा, सदैव माकडचेष्टा असायच्या परंतू सावरकरांच्या दबावाखाली थोडे गंभीर होत गेला. सावरकरांचे (Veer Savarkar) संभाषण. संगत नि मित्रमेळयाचा संस्काराचा त्यांच्यावर हळूवार परिणाम झाला. नि हे सखारामपंत गोरे ध्येयशून्य ध्येयभक्त झाला. त्यांनी कापड दुकान सुरू केले परंतू सारा वेळ त्यांचे मन. मेंदू देश कार्यातच रमत. त्यांच्या दुकानाच्या भिंतीवर ‘देशासाठी मरा’ असे लिहले असे. व जमाखर्चाच्या दुकानाच्या हिशोबी चोपडयांवर स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार असे. सावरकर कुटूंबियांवर निस्सिम प्रेम करणारा हा सहकारी आपल्या पत्नीच्या अंगावरचे सगळे दागिने गहान टाकून बाबाराव सावरकरांना मदत केली.
दुकानाच्या नफ्यातून कातीपक्षीयांना साहय करीत. स्वदेशाच्या स्वातंत्र्या करिता अनन्वित शारिरीक छळ सोसावे लागले तरी प्राण जाईस्तो विश्वासघाताचा शब्द न ऊच्चारता त्यासाठी अखेर प्राण सोडणारा हुतात्मा सखारामपंत ठरला. त्याच्या मृत्युचे रहस्य इतिहासाला उलगडता आले नाही. त्याच्या देशभक्तीचा खरा कस नाशिक कटाच्या 1910 मधे लागला. त्यांना कोंडून ठेवले तेथे नविन कैदी येत त्यां ओरडून ओरडून सांगत ‘खोटे नाटे जबाब देवू नका’ काही झाले तरी फितूर होवू नका. असे सांगतात. सखारामपंताना पोलिसांनी मॅग्नेशियाचे पाणी बळजबरीने पाजले तरी झुकले नाही. भयंकर शिक्षा झाली त्यात ते गेले असे कुणी सांगतात तर कुणी कि पिसाळण्याचे इंजेक्शन त्यांना देण्यात येवून ते मग पिसाळले म्हणून गोळी घालण्यात आली. सत्य काय हे इतिहासाला कळू शकले नाही हे खरं ! असे कितीतरी सहकारी त्यात एक श्री मायदेव हे अतिशय विनोदी. ते उनाड नव्हते परंतु देशकार्यात पडले ते सावरकरांच्या संगतीने. सावरकरांचा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा यांचा प्रवास थांबला. पुढे एक विनोदी नट म्हणुन एका नाटक मंडळीत प्रसिद्धी पावला असे. सावरकरांना (Veer Savarkar) अंदमानात कळले.

 

असाच एक निष्ठ सहकारी श्री. धर्मवीर नि कांतीवीर विश्वासराव डावरे 17, 18 वयाच्या बवयात जॅक्सन कटात अडकलेले. सा-या सहका-यांचे कार्य कर्तृत्व अफाट, त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती नि सावरकर प्रेम, मित्रमेळा संस्थेवरच ममत्व. सा-या सहका-यानी वेळ प्रसंगी चळवळी, आंदोलने, कट, खटले, शिक्षा, छळ, मानसिक त्रास सोसला. घरादारांवर तुळशी पत्रे ठेवली, अनेक जोखीम कामे केली. पिस्तौलाच्या अफरातफर पासून तर बॉम्ब बनविण्यापर्यंत. या सा-यांवर स्वतंत्र लिखाण करतो म्हटले तर लेखाचा पसारा वाढेल नव्हे एक छोटीखानी पुस्तिका तयार होईल तेव्हा शब्द मर्यादा अभावे काहीचा केवळ नाम ऊल्लेख केला तरी सिद्रामप्पा वाळवे, विष्णू रहाळकर, दामोदर रावजी रानडे, भागण नारळीआप्पा, भाई जोगळेकर असे कितीतरी नावे विस्मरणाच्या उदरात गडप झाली. देश स्वातंत्र्या करिता प्राणपणाला लावणा-या सा-या सहका-यांना व वीर सावरकरांना जयंती निमित्य विनम्र अभिवादन.
भगूर गावचे प्रेम केवढे विनायकावरती !
जणू अयोध्या नगर वासी भाळले श्रीरामावरती !!

(लेखक सावरकर अभ्यासक आहेत.)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.