Veer Savarkar : हिंदु राष्ट्रासाठी मशाल पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर

Veer Savarkar : कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, तर प्रथम विष पचवावे लागते, तरच आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते. आपले ध्येय ‘हिंदु राष्ट्र स्थापन करणे’ हे आहे. त्यासाठी हिंदूंना स्वकीय आणि परकीय यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे,

153
Veer Savarkar : हिंदु राष्ट्रासाठी मशाल पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर
Veer Savarkar : हिंदु राष्ट्रासाठी मशाल पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर

रमेश शिंदे

‘समुद्र मंथनातून १४ गोष्टी बाहेर आल्या. पहिली गोष्ट होती विष आणि शेवटची अमृत ! (Veer Savarkar) कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, तर प्रथम विष पचवावे लागते, तरच आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते. आपले ध्येय ‘हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) स्थापन करणे’ हे आहे. त्यासाठी हिंदूंना स्वकीय आणि परकीय यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे, म्हणजे विष पचवावे लागणार आहे. यासाठी आपण सर्व सिद्ध आहात का?

अधिकाऱ्यांना खडसावणारे स्वा. सावरकर !

इंग्रजांनी सावरकरांना ५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. ते अंदमानात (Andaman) आले तेव्हा तुरुंग अधिकारी बारीने त्यांना डिवचत म्हटले, “तुला ५० वर्षांची शिक्षा झालीय.” त्यावर सावरकर म्हणाले, ‘‘यापुढे ५० वर्षे या देशावर इंग्रजांचे राज्य रहाणार आहे का?’’ त्यांना अभिप्रेत होते की, तोपर्यंत आम्ही इंग्रजांना हुसकवून लावू. सावरकरांनी अनेकदा बारीची बोलती बंद केली आहे.

उद्दाम मुसलमान कैद्यांना सावरकरांनी शिकवला धडा!

सावरकरांना अंदमानातील कारावासात ठेवले होते. तेथील हिंदु कैद्यांनी सावरकरांना (Veer Savarkar) सांगितले की, येथील मुसलमान कैदी जेवणाच्या वेळी तेथे प्रथम जाऊन पातेल्यांना हात लावतात आणि म्हणतात, ‘‘आता अन्न बाटले. यातील अन्न जो कुणी खाईल, तो मुसलमान होईल.’’ त्यामुळे पुष्कळ हिंदू न जेवता उपाशीच रहायचे. सावरकरांच्या जेवणाच्या वेळी नेहमीप्रमाणे मुसलमान कैद्याने त्या भांड्याला हात लावून वरील उद्गार काढले. तेव्हा सावरकर हातात नारळाच्या करवंटीत पाणी घेऊन पुढे गेले आणि भांड्याभोवती पाणी गोल फिरवून म्हणाले, ‘‘आता हे शुद्ध झाले. तू ख्रिस्ती आणि हिंदू यांचे अन्न खाल्ले, तर तुझा धर्म पालटेल का ?’’ त्यावर तो ‘नाही’ म्हणाला. तेव्हा सावरकर गरजले आणि म्हणाले, ‘‘जर तुम्ही आमचे अन्न खाल्ले, तर तुमचा धर्म पालटत नाही. मग आमचा धर्म कसा पालटतो ?’’ त्यानंतर सावरकर हिंदु बंदीवानांना उद्देशून म्हणाले, ‘‘अरे, हे अन्नच काय? याला कच्चे खाल्ले, तरी आपला धर्म पालटणार नाही. धर्माचे स्थान हृदयात असते, पोटात नव्हे !’’ सावरकरांमुळे हिंदु कैद्यांची धर्मांतरे (Conversions) थांबली. ‘सावरकर होते; म्हणून अंदमान सुरक्षित राहिले. अन्यथा ते दुसरे पाकिस्तान झाले असते’, असे गौरवोद्गार अंदमान शासनाने सावरकरांविषयी काढले.

तरुणाईला घडवण्याचा मूलमंत्र दिला

‘६ जानेवारी १९२४ या दिवशी अंदमानच्या कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) सुटले आणि मुंबईला आले. ७ किंवा ८ तारखेला बहुधा सोमवार असावा. सोमवारी सकाळपासून तात्यांची (स्वातंत्र्यवीर सावरकर यांची) भेट घेण्यासाठी तरुण मंडळी आणि विद्यार्थी यांची रीघ लागली होती. ९.३० वाजण्याच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर तात्यांना भेटण्यास आले. ते त्यांना नमस्कार करू लागले. तोच तात्यांनी त्यांचे हात धरून स्वतःच त्यांना नमस्कार केला. तात्या खाडिलकर यांना म्हणाले, ‘‘सकाळपासून तरुण आणि विद्यार्थी यांची रीघ लागली आहे; पण त्यांना पाहून माझ्या मनात सातत्याने एक प्रश्न घुमत आहे. आपणच त्याचे उत्तर देऊ शकाल. प्रश्न विचारू का?’’ काकांनी (म्हणजे कृष्णाजी खाडिलकर यांनी) ‘विचारा’ म्हणताच तात्या म्हणाले, ‘‘आपल्यासारख्या लेखकांच्या लेखांनी आम्ही क्रांतीचक्रात सापडून भिंतीआड झालो. त्या वेळी तरुणांच्या तोंडवळ्यावर जे तेज आणि ओज दिसत होते, ते आजच्या तरुणांच्या तोंडवळ्यावर दिसत नाही. याला उत्तरदायी कोण?’’ यावर काकांनी हसत ‘सध्याची शिक्षणपद्धती’ असे उत्तर दिले. त्यावर तात्या म्हणाले, ‘‘छे ! छे ! पटत नाही. हे वरवरचे कारण असेल. मला तर असे वाटते की, जी खाडिलकरांची लेखणी ‘किचकवध’सारखी नाटके लिहीत आणि तरुणांच्या मनात क्रांतीच्या ज्वाला उसळवीत होती, तीच खाडिलकरांची लेखणी जेव्हा ‘भास मला जाहला पाहता कोपला’ असे वाङ्मय निर्माण करू लागली आहे, तेव्हापासूनच या तरुणांतील तेज अन् ओज नष्ट होऊ लागले असावे. आपल्यासारखे पुढारीच याला उत्तरदायी आहेत.’’ त्या वेळी काकांनी हसून वेळ मारून नेली; पण त्यांचा तोंडावळा मात्र पडल्याचे दिसून आले.’

शासनाकडून सातत्याने सावरकरांची उपेक्षा !

स्वा. सावरकरांना इंग्रजांनी अटक केली, त्या वेळी त्यांनी सावरकरांची भूमी, वाडी इत्यादी जप्त केली. भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, तरी त्यांच्या वंशजांना ती परत मिळाली नाही. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सावरकर हयात होते; पण स्वातंत्र्यदिनी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला त्यांना बोलवले नव्हते. भारत सरकार कारावास भोगणा-या भारतीय नसलेल्या नेल्सन मंडेला यांना ‘भारतरत्न’ हा सर्वाेच्च पुरस्कार देते; पण देशासाठी १३-१४ वर्षे कारावासात, हालअपेष्टा भोगणा-या स्वा. सावरकरांना काय दिले? केवळ उपेक्षाच! स्वा. सावरकरांचा ख्रिस्ताब्द १९५० मध्ये सन्मान करणारे ब्रिटीश कुठे आणि भारताच्या संसदेत ख्रिस्ताब्द २००३ पर्यंत स्वा. सावरकरांचे साधे तैलचित्रही न लावणारे भारतीय कुठे!

अखेर ब्रिटीश संसदेनेही स्वा. सावरकर यांच्याप्रती व्यक्त केला आदर

‘आपल्या इतिहासकारांनी प्रामाणिकपणे नोंद घेतली, तर ७ जून १९८५ हा दिवस निश्चितपणे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य इतिहासात सोन्याचा दिवस म्हणून गणला जाईल, यात शंका नाही. अभिमान वाटावा, अशी घटना, म्हणजे ज्या महान भारतीय क्रांतिकारकाने ब्रिटिश साम्राज्याला ‘सळो की पळो’ करून सोडले होते आणि ब्रिटिश साम्राज्याने ज्यांचा ‘खतरनाक शत्रू’ म्हणून उल्लेख केला होता, त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी ब्रिटिश संसदेने त्या दिवसाचे कामकाज स्थगित केले होते. ब्रिटिश संसद सदस्य वेस्ट मिनिस्टर्सच्या सभागृहात प्रेम वैद्य (ख्रिस्ताब्द १९८३ च्या वर्षाचे सर्वाेत्कृष्ट माहितीपट विजेते) यांचा सावरकरांवरील चित्रपट पहाण्यासाठी एकत्र जमले. याप्रसंगी ‘पाच वादळी वर्षे – लंडनमध्ये सावरकर’ (लेखक डॉ. हरींद्र श्रीवास्तव) या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

स्वा. सावरकर यांच्या नावाच्या सन्मानचिन्हाचे समारंभपूर्वक अनावरण

दुसऱ्या दिवशी ७० ते ८० संसद सदस्य तसेच ग्रीसचे लंडनमधील परराष्ट्र अधिवक्ते लंडनमधील ‘इंडिया हाऊस’मध्ये (India House) एकत्र आले. येथूनच ख्रिस्ताब्द १९०६ ते १९११ या काळात सावरकरांनी शत्रूच्या शिबिरातून स्वातंत्र्यासाठी सर्वंकष क्रांतीचा संदेश दिला अन् त्या अनुषंगाने क्रांतीकार्य केले होते. तेथे निळ्या रंगाच्या ब्रिटीश सन्मानचिन्हाचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. या चिन्हावर ‘वि. दा. सावरकर (१८८३ ते १९६६) महान देशभक्त आणि तत्त्वज्ञानी यांचा निवास होता.’ अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला आहे.  या सन्मानचिन्हाचे अनावरण लेबर पार्टीचे संसद सदस्य ९७ वर्षांचे लॉर्ड फेनर ब्रॉकवे यांनी केले. त्या वेळी त्यांनी घोषणा केली की, ब्रिटीश सत्तेने सावरकरांच्या विरोधात बिनबुडाची आणि लबाडीची असत्य विधाने केली होती अन् पुढे ठासून सांगितले की, कोणत्याही देशाला सावरकरांसारख्या देशभक्ताचा अभिमानच वाटेल.’

गमावलेला स्वाभिमान भारताला सावरकर विचारानेच परत मिळेल !

‘देशातील समस्यांचे निवारण करू शकणारे स्वा. सावरकर हे एकमेव होते. प्रत्येक समस्येवर त्यांच्याकडे उपाययोजना सापडते. अमेरिका, युरोप खंडातील देश ‘सावरकर’ जगतात. म्हणून हे देश जगात ताठ मानेने जगतात तसेच कणखर आणि प्रगती करणारे देश म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. याउलट भारत ‘गांधीवादी’ असल्याने भारताची पूर्वी दु:स्थिती झाली होती.’

सावरकरांचे वंशज असलेल्या हिंदूंनो, जागृत व्हा !

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या. कारागृहात असतांनाही हिंदूंना जागृत केले. हिंदूंना चेतवले आणि कोण कुठला ओवैसी म्हणतो, ‘‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, हिंदूंना संपवतो.’’ द्रमुक पक्षाचा स्टॅलीन आणि ए. राजा म्हणतो, ‘‘सनातन धर्म संपवला पाहिजे.’’ हिंदूंनो, यांना सांगा, ‘‘आम्हाला संपवण्याचे काम भेकड गिधाडे करूच शकत नाही. आम्ही हिंदू नरसिंह आहोत. नरसिंहाला मारण्याचे धाडस गिधाडांमध्ये नाही. ‘आम्ही हिंदु राष्ट्रासाठी पेटलेल्या मशाली आहोेत’, हे लक्षात ठेवा !’’ (Veer Savarkar)

(लेखक हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.