हिंदूंना जाज्वल्य प्रेरणाशक्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज!

238

आज या हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही अल्पसंख्यांकांकडून छोट्या-छोट्या घटनेत मार खाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. असे प्रकार दिवसेंदिवस हिंदुबहुल हिंदुस्थानात वाढत आहेत. हे प्रकार थांबवून हिंदूंना ताठ मानेने जगायचे असेल आणि धर्मांध अल्पसंख्यांकांना धाक बसवायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शक्ती, युक्ती आणि भक्ती या रणनीतीचा वापर करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे अद्भूत आणि शाश्वत असे स्फूर्तीस्थान आहेत. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. स्वत:च्या प्राणांची तमा न बाळगता त्यांनी मानवी रूपातील अनेक दैत्यांचे पारिपत्य केले. हिंदू स्वसामर्थ्यावर शक्तीशाली मुघलांना आव्हान देऊ शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवले. भविष्यात या देशात हिंदूंना जिवंत रहायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही आदर्श नीती समस्त हिंदूंना जाणून घ्यावीच लागेल.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यस्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. तत्पूर्वी शेकडो वर्षे दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानात मुसलमानी राजवटींनी हैदोस घातला होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड। बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे मुसलमानांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते. आदिलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, निजामशाही या दक्षिणेकडील मुसलमानी राजसत्ता आणि उत्तरेकडील मदोन्मत्त मुघलशाही हे सर्व जण हिंदूंचा ते केवळ हिंदू आहेत; म्हणून छळ करत होते. ‘ही मुघलांची सत्ताच हिंदुस्थानातून उखडून लावली पाहिजे’, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू होता. ‘श्रीं’चे राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू असल्याने वरील दोन्ही गोष्टी करणे आवश्यक होते.

ध्येयपूर्तीसाठी उचललेली पावले

शिवाजी महाराजांनी अनेक जय-पराजय यशस्वीपणे पचवले अाणि झेललेही. अफझलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावल्यावर महाराजांची राजकीय सामर्थ्य वाढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाढते सामर्थ्य ओळखून मुघल सम्राट औरंगजेबाने आपला सेनापती रजपूत राजा मिर्झाराजे जयसिंहास एक लाख सैन्यासह दक्षिणेस महाराजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले. या वेळी बळ कमी पडल्याने महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. तह करण्याची वेळ आली, तरी महाराजांनी हा तह ‘स्वत:चा जीव वाचावा’ या हेतूने नाही, तर हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून दूरदृष्टीने आणि मुत्स्द्देगिरीने केला. त्यासाठी आवश्यक अशा पराकोटीच्या त्यागाचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये धर्माचरणाने, भवानीमातेच्या उपासनेने व सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने निर्माण झाले.

( हेही वाचा: पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी 2 हजार कोटींची डील; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप )

मुसलमानांच्या चाकरीने स्वत्त्व गमावलेले हिंदूंमध्ये स्वसामर्थ्याचे तेज जागवले

त्या वेळच्या हिंदुस्थानात उत्तरेकडील मुघल राजवट सर्वात जास्त बलवान आणि क्रूर होती. संपूर्ण हिंदुस्थानातील अनेक राजे, सरदार, योद्धे या मुसलमानी राजवटींची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. औरंगजेबाच्या आदेशाने स्वराज्यावर चाल करून आलेल्या रजपूत राजा जयसिंहाचे मन वळवण्याचा महाराजांनी पुष्कळ प्रयत्न केला. ‘आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापूया’, असा विचार त्याच्यासमोर मांडला. त्याला राजेपद देऊ केले; पण अनेक पिढ्यांच्या मुघलांच्या चाकरीने हिंदू स्वत:चे स्वत्त्व गमावून बसले होते. त्यामुळे हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानांचे मांडलिक असणाऱ्या या हिंदूंशीच लढावे लागत होते. हिंदूच हिंदवी स्वराज्य स्थापनेतील अडथळा बनून राहिले होते. अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी हिंदूंमध्ये स्वतःच्या सामर्थ्याचे तेज जागवणे आवश्यक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते.

 महाराजांमुळे अनेक हिंदू राजे मुघलांच्या विरोधात उभे ठाकले

या घटनेची साऱ्या जगाने नोंद घेतली. हिंदु स्वसामर्थ्यावर शक्तीशाली मुसलमानांना आव्हान देऊ शकतात, हा संदेश सर्व हिंदूंपर्यंत पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यावर औरंगजेबाची विलक्षण बदनामी झाली. महाराजांच्या मुत्सद्देगिरीची आणि पराक्रमाची किर्ती मात्र जगभर पसरली. महाराजांच्या या सुटकेने प्रेरणा घेऊन अनेक हिंदू मुघलांविरुद्ध उभे राहिले. औरंगजेबाचा सरदार शाहिस्तेखान आणि रामसिंग यांच्या सेनेविरुद्ध त्याने ब्रह्मपुत्रेच्या पात्रात नाविक लढाई केली आणि ती जिंकली. औरंगजेबाचा सेनापती राजा जयसिंहाचा मुलगा राजा रामसिंग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हितचिंतक झाला. उत्तर हिंदुस्थानातून भूषणसारखे कवी आणि छत्रसाल बुंदेलासारखे वीर महाराजांच्या आश्रयाला आले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील मोहीम ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील निर्णायक मोहीम ठरली. महाराज आग्र्याहून निसटल्यावर मुघल साम्राज्यास खरी उतरती कळा लागली. पुरंदरच्या तहात द्यावे लागलेले सर्व किल्ले आणि प्रदेश महाराजांनी पुन्हा जिंकून घेतले. हिंदवी स्वराज्याचा विस्तार दक्षिणोत्तर अशा दोन्ही दिशांना होऊ लागला. औरंगजेबाचा हिंदू सरदारांवरील विश्वास उडाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला स्वतःला ५ लाखांच्या सैन्यानिशी दक्षिणेची मोहीम उघडावी लागली. आदिलशाही आणि निजामशाही त्याने १-२ दिवसांतच संपवली; मात्र स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या हिंदूंनी (मराठ्यांनी) त्याला जवळपास २५ वर्षे झुंजवले आणि शेवटी त्याचा याच हिंदवी स्वराज्यात मृत्यू झाला.

आग्र्याची धाडसी मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांनी वरील उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून पुरंदरच्या तहाच्या आडून सर्वाेत्त्कृष्ट आणि धाडशी चाल आखली. तहानुसार त्यांनी औरंगजेबाला २३ किल्ले परत दिले. त्या कालावधीत महाराजांनी राजा जयसिंहास विजापूरच्या स्वारीवर साहाय्य करून विजय मिळवून दिला. त्यामुळे प्रसन्न होऊन औरंगजेबाने चर्चा करण्यासाठी महाराजांना आग्र्याला येण्याचे निमत्रंण दिले. या संधीचा लाभ उठवण्याचा धाडशी निर्णय महाराजांनी घेतला. त्यांनी तत्कालीन मुगल साम्राज्याच्या राजधानीत म्हणजे आग्रा येथे पुत्र संभाजीसह औरंगजेबासमोर उपस्थित होण्याचे मान्य केले. वास्तविक स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या क्रूर औरंगजेबाच्या २ हजार कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या आग्र्यातील दरबारात स्वतःहून जाणे, म्हणजे ‘वाघाच्या जबड्यात स्वत:हून जाण्यासारखे आहे’, हे महाराज जाणून होते. तेथे आपल्याला धोका होणार, हेही मुसलमानांची कूटनीती जाणणाऱ्या महाराजांना ज्ञात होते; पण हिंदवी स्वराज्यासाठी पराकोटीच्या त्यागाची तयारी ठेवणाऱ्या आणि ईश्वरावर निष्ठा असणाऱ्या महाराजांनी ही संधी साधली. या संधीचा लाभ उठवत त्यांनी समस्त हिंदूंमधील तेज आणि सामर्थ्य जागवण्याची धाडसी मोहीम आखली. औरंगजेबाच्या दरबारात संपूर्ण हिंदुस्थानातील अनेक हिंदू राजे आणि सरदार चाकरीला होते. मुघलांच्या सेवेमध्ये त्यांच्या अनेक पिढ्या खपल्या होत्या. अशा भरलेल्या दरबारात महाराजांनी प्रवेश केला आणि ‘मी हिंदू राजा असतांना मला सरदारांच्या रांगेत उभे केले’, असे म्हणून त्यांनी मुघल बादशहा औरंगजेबासमोर उभे राहून सर्वांसमोर त्याचा अपमान करून भर दरबारातून निघून गेले. त्यामुळे औरंगजेबाने महाराजांना अटक करून नजरकैदेत ठेवले आणि त्यांना ठार मारण्याची योजना आखली; मात्र महाराज अलौकिक साहस आणि बुद्धीमत्ता यांच्या क्षमतेवर औरंगजेबाचा कडेकोट बंदोबस्त तोडून पुन्हा स्वराज्यात सुखरूप परत आले, हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे.
(लेखक- सुनील घनवट: हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक.)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.