या कालावधीत राज्यात मासेमारी बंदी 

79

राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये दिनांक १ जून २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.

मासेमारी बंदी 

या कालावधीत मत्स्य प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंद केल्यामुळे खराब/वादळी हवामानामुळे मच्छिमारांची होणारी जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौंकाना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांना लागू राहणार नाही.

( हेही वाचा : आता आम्ही काय खायचे? बेस्ट कामगार झाले संतप्त! )

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे ) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात ( सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम ( सुधारणा)२०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. असे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.