Hindusthan Samachar बहुभाषिक वृत्तसंस्थेचा 77 वर्षांच्या वाटचालीनिमित्त देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्काराने गौरव   

विश्व संवाद केंद्र मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पुरस्कार सन्मान सोहळा मुंबईच्या बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सभागृहात शनिवारी पार पडला.

38

आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांच्या जीवनाचे प्रतिबिंब आजच्या पत्रकारितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे चित्र आशादायी आहे, असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २०२५ येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, निबे ऑर्डनन्स अँड मेरीटाईम लिमिटेडचे गणेश निबे, एडलवाईस ग्रुपचे अध्यक्ष राशेस शहा, शिवसेेनेचे राज्यसभेतील खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते.  (Hindusthan Samachar)

विश्व संवाद केंद्र मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पुरस्कार सन्मान सोहळा मुंबईच्या बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सभागृहात शनिवारी पार पडला. यावेळी हिंदुस्थान समाचार (Hindusthan Samachar)   बहुभाषिक वृत्तसंस्थेच्या 77 वर्षांच्या वाटचालीनिमित्त ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार’ श्रेणीत विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार मुंबई (महाराष्ट्र) ब्युरो प्रमुख सुधांशू जोशी यांनी स्वीकारला. या प्रसंगी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबई समाचार या संस्थेचा, तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने समीर कर्वे (प्रिंट मीडिया), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक मीडिया), शैलेश गायकवाड (सोशल मीडिया), पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर, या व्यतिरिक्त, सोशल मीडिया पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक, इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे, पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले यांनाही सन्मानित करण्यात आले.

(हेही वाचा Kundmala Bridge वर होते 200 ते 250 लोक; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खऱ्या अर्थाने मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार केला असल्याचे मनोगतही गोयंका यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पत्रकारिता आणि राष्ट्रवाद या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संचालक अनंत गोयंका यांनी भाग घेतला. या चर्चासत्रात आपली भूमिका मांडताना मिलिंद देवरा म्हणाले की, विविधतेमधली एकता ही भारताची ओळखच नव्हे, तर हे भारताची ताकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर आणि त्या अनुषंगाने भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात गेले, त्यावेळेला दहशतवादाविरोधातली भारताची एकजूट ही जगाच्या निदर्शनास आली. (Hindusthan Samachar)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे म्हणाले की, भारतीय विचार हा विश्वाच्या कल्याणाचा विचार कायम करत राहिला आहे. हा विश्वात्मक विचार आणि या विचाराचे चिंतन आपल्याला पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा बघायला मिळतं. अनुषंगाने निरपेक्ष निर्भीड पत्रकारांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.