-
सचिन धानजी, मुंबई
मुंबईकरांना पुरवठा होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये सध्या केवळ २३ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असला तरी यंदा मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. उलट मुंबईत पाणीपुरवठा बाबत होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेने १०० दशलक्ष लिटर अधिक पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना ४००० दक्षलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत होता, पण भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातून राखीव साठ्यातून पाणी देण्यास देण्यास जलसंपदा विभागाने तत्वतः मान्यता दिल्याने सध्या मुंबईकरांची तहान अधिक भागवण्यासाठी १०० ते १२५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. (Water Supply)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरण तथा तलावांमधून दैनंदिन ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या यासर्व धरण तथा तलावांमध्ये वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या ५ मे २०२५ पर्यंत २३ टक्के एवढा आहे तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत सुमारे १८ टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा त्याप्रमाणे पाच टक्के अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (Water Supply)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी पाण्याची वाढती मागणीचा विचार करता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून पाणीकपात करावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव जलसाठ्यातून महापालिकेला पाणी उपलब्ध व्हावे यसाठी सरकारकडे मागणी केली आहे. याला जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पुरेसा पाणीसाठा आणि भविष्यात राखीव कोटा लक्षात घेता १०० ते १२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढवण्यात आला. त्यामुळे सध्या ४१०० ते ४१२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्व धरणातील पाणीसाठा ८ टक्क्यांवर येताच राखीव कोट्यातील पाणी उचलण्यात येईल. राखीव कोट्यातून उर्ध्व वैतरणा धरणातून ६५ लाख क्युसेस आणि भारतातून १ लाख ११ हजार क्युसेस पाणी उचलले जाईल. मात्र हे पाणी गरजेनुसार उचलले जाईल. जर पावसाला आल्यास येथील पाणी उचलले जाणार नाही. कारण शासनाच्या धरणातून उचलल्या जाणाऱ्या महापालिकेला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार राखीव कोट्यातील पाणी उचलले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Water Supply)
मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) पाणी उपलब्ध करून दिले आहे. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ५ मे २०२५ उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Water Supply)
Join Our WhatsApp Community