मुंबई : महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात पहिली पासूनच सैनिकी शिक्षणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली आहे. नाशिक येथे आयोजित समर युथ समिट २०२५ च्या समारोप प्रसंगी दादा भुसे बोलत होते. केंद्र व राज्य शासन आज जे राष्ट्रहिताचे निर्णय घेत आहे, त्यातून नाव न घेता शासन स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधाराच अवलंबत आहे असे दिसते. सशक्त भारत घडवण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच सैनिकी प्रशिक्षणाचा अंतर्भाव करावा असे सावरकरांचे विचार होते. सावरकरांनी कायमच सैनिकीकरणाचा पुरस्कार केला होता. नॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना हेच विचार सावरकरांनी मांडले होते. (Veer Savarkar)
नॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर सावरकरांचे भाषण
सावरकरांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर विचार मांडले की, “तुमचे आजचे वय जे आहे ते धाडसी कृत्ये करण्याचे वय आहे. या वयात तुम्ही काहीतरी विशेष करुन दाखवण्याचा निश्चय केला पाहिजे. विश्वाची प्रगती, असामान्य बुध्दी असलेल्या पुरुषांनीच नवीन शोध लावून, महाकार्ये करुनच साध्य केली आहे. असे श्रेष्ठ पुरुष जन्माला आल्याशिवाय देश आजच्या दुर्गतीतून बाहेर पडायचा नाही. त्यासाठी आपण कार्य करावे. त्यासाठी शरीर सुदृढ करावे. यादृष्टीने माझी कॉलेजच्या संचालकांना सूचना आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना निदान लाठीचे शिक्षण नि संचलन शिकवण्यास प्रारंभ करावा” असे विचार सावरकरांनी त्या दिवशी मांडले होते. त्याबद्दल तत्कालिन वृत्तपत्रांतही हे भाषण अतिशय ओजस्वी झाले होते असे मत मांडले होते. (Veer Savarkar)
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : पंजाब किंग्जनी आयपीएलमध्ये केलेले विक्रम)
सावरकरांचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन भाषण –
१९३८ मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर सावरकर होते. या भाषणातच त्यांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा संदेश दिला होता. त्यांच्या या उद्गारांनी तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी आपल्या भाषणात सावरकर म्हणाले की “आपले हे एवढे विस्तीर्ण भारतीय राष्ट्र आज जगात निर्माल्यवत होऊन पडले आहे ते आपले साहित्यबळ उणे आहे म्हणून नाही तर आपले शस्त्रबळ उणे आहे म्हणून. ही गोष्ट साहित्यिकहो सर्वात आधी तुमच्या लक्षात यायला हवी. म्हणून सगळ्यात आधी तुम्हीच गर्जून उठा की, आजच्या परिस्थितीत आपले राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ, साहित्य चर्चा नव्हे. जे थोडेबहुत साहित्य हवे ते चाळीशीपुढे गेलेले लोकही पुरवतील, परंतु जे तरुण, ज्या तरुणी, पाठीचा ताठ कणा असलेली जी पिढी आहे, त्यांना माझा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत! राष्ट्र रक्षणार्थ प्रथम रायफल क्लबमध्ये घुसा. रडगाण्यांच्या आणि रडकथा यांच्या साहित्य संमेलनात नंतर वेळ मिळाल्यास साहित्यासाठीसुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यही खुरटे व दुबळे असणार, ज्या दुबळ्यांच्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते! असे विचार सावरकरांनी मांडले होते. (Veer Savarkar)
उशीरा का होईना सावरकरांचे विचार आज शासन मान्य करत आहे – रणजित सावरकर
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयावर उशीरा का होईना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आज शासन मान्य करत आहे अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली आहे. आज शासन करत असलेली कामे, शासनाची ध्येयधोरणे ही सर्व सावरकरांच्याच विचारांवर आधारित आहेत, हा सावरकरांच्या विचारांचा विजयच आहे. आधीच्या शासनकर्त्यांनी नेमका याच्या उलट विचारांचा अवलंब केल्यामुळे भारताची आर्थिक, सामाजिक, लष्करी प्रगती खुंटली होती. परंतु सावरकरांच्या विचारांचा अवलंब केल्यामुळेच आज शासनाने एवढी प्रगती केली आहे. आजच्या शासनाने राबवलेले ऑपरेशन सिंदूर हे त्याचेच सर्वात मोठे निदर्शक आहे. त्यामुळे थेट नाव घेतले नसले तरी आजचे शासन सावरकरांचीच नीती अवलंबत आहे असे मत रणजित सावरकर यांनी मांडले आहेत. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community