Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) पुरस्कार २०२५’ सोहळ्यात लेफ्टनंट कर्नल अनिल अर्स (शौर्यचक्र) यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत आयआयटी मुंबईचे उपसंचालक (कला) प्रोफेसर मिलिंद अत्रे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजय सखाराम जोग यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर प्रकृति अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले वैद्य चिंतामण नारायण साठे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृति पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Veer Savarkar)
वीर सावरकरांच्या विचारांचे महत्त्व
या पुरस्कार प्रदान सोहळ्यास विशेष उपस्थित असलेले ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीत वीर सावरकरां(Veer Savarkar)च्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, वीर सावरकर हे असे नेते होते ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर खूप लिहिले. मी तुमच्यासमोर एक मुद्दा मांडू इच्छितो. दुसरे महायुद्ध झाले तेव्हा इंग्रजांना सैनिकांची कमतरता भासू लागली. सावरकरांनी म्हटले होते की, भारतीयांनी सैन्यात भरती व्हावे. त्या काळातील सर्व नेत्यांना वाटले की, नाही असे होऊ नये. कारण इंग्रज आपले शत्रू आहेत. जर आपण त्यांच्या सैन्यात सामील झालो तर ते चुकीचे ठरेल. परंतु सावरकर म्हणाले की, काही वर्षांनी आपला देश स्वतंत्र होणार आहे आणि आपल्याला मिळणारे प्रशिक्षण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, असे महाजन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, एक काळ असा होता की ब्रिटीश सैन्यात ६ लाख सैनिक होते आणि ब्रिटीश भारतीय सैन्यात २६ लाख सैनिक होते, म्हणजेच चार ते पाच पट जास्त. या परिस्थितीत युद्ध कसे लढले गेले. मी त्याबद्दल बोलणार नाही पण तुम्ही हे लक्षात ठेवा की त्यानंतर, ४७-४८ च्या युद्धात, आमचे कमांडर जनरल करिअप्पा होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता आणि आमच्या नेतृत्वानेच आम्हाला ४७ चे युद्ध जिंकण्यास मदत केली. ६५ चे युद्ध आणि ७१ चे युद्ध जिंकण्यास मदत केली. जे आमच्या इतिहासातील एक अतिशय सुवर्ण अध्याय असून त्यात कमांडर फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ होते. ते दुसऱ्या महायुद्धात लढले होते. ते म्हणायचे की युद्धाची कला, युद्धनीती समजून घेण्यासाठी वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या सैन्याने पाकिस्तानला अचूकतेने केले लक्ष्य
ब्रिगेडियर महाजन म्हणाले, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे माध्यमांनी कव्हरेज केले होते. परंतु त्यानंतर काही वेळ लागला. आम्ही ९ मे रोजी क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी तीन ठिकाणी लष्कर तैयबा, जैश मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र होते. देशातील लोक आपले सैन्य कधी हल्ला करेल याबद्दल उत्सुक होते. पण ते इतके सोपे नाही. शस्त्रास्त्रांची तयारी आणि सैनिक तैनात करण्यास वेळ लागतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानला अचूकतेने लक्ष्य केले आणि त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा पुनरुच्चार ब्रिगेडियर महाजन यांनी यावेळी केला.
(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखात झाला संपन्न )
भारताने शत्रू देशाला मोठ्या अडचणीत आणले
सिंधू जलकरार स्थगित झाल्यानंतर त्याबाबत बऱ्याच चर्चांच्या फैरी झडल्या. याबाबत बोलताना ते म्हणाले की, सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर देशातील लोकांनी नदीचे पाणी कसे थांबवता येईल, असे म्हटले होते. परंतु भारताने पाकिस्तानला दिले जाणारे पाणी अगदी योग्यरित्या थांबवले आणि शत्रू देशाला मोठ्या अडचणीत आणले. एक प्रकारे हे जलयुद्ध असल्याचे सांगतानाच ते म्हणाले की, आपल्याला वीर सावरकरांचा विचार अंमलात आणावा लागेल. आपल्याला बांगलादेशी घुसखोर आणि इतर स्लीपर सेल्स ओळखावे लागतील आणि त्यांना देशाबाहेर हाकलून लावावे लागेल. वीर सावरकरां(Veer Savarkar)चे स्वप्न होते की प्रत्येक व्यक्तीने सैनिकासारखे वागावे, सैनिकासारखे विचार करावे. आज आपल्याला त्यांचे विचार अंमलात आणून देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करावी लागेल, असे मत सावरकरांच्या विचारांचा दाखला देत ब्रिगेडियर(नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.(Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community