Bhagwati Hospital च्या खासगीकरणावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सूचवला नवा पर्याय; जाहिरात रद्द करण्याचे दिले निर्देश

1195
Bhagwati Hospital च्या खासगीकरणावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सूचवला नवा पर्याय; जाहिरात रद्द करण्याचे दिले निर्देश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरीवली भगवती रुग्णालयाचे (Bhagwati Hospital) खासगीकरण करण्यात येत असल्याने याला विरोध होत असून याबाबत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत या रुग्णालयाच्या सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावरील अर्थात पीपीपी धोरणात बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यामुळे भगवती रुग्णालय हे केवळ महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुषमान योजनेचाच लाभ दिला जाईल अशाप्रकारेच ते चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे रुग्णालय चालवले जावे अशाप्रकारची सूचना प्रशासनाला केली आहे. दरम्यान, या दोन्ही योजनांचा समावेश महापालिकेच्या पीपीपी धोरणात असून जर पूर्णपणे आरोग्य योजनांवर हे रुग्णालय चालवायचे झाल्यास एकही संस्था पुढे येणार नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त याबाबत काय भूमिका आणि निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – Paneer Adulteration : पनीर ऐवजी चीज ॲनालॉग वापरल्यास मेनू कार्डवर उल्लेख बंधनकारक)

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री यांनी आपल्या मतदारसंघातील विविध नागरी कामांबाबतची चौथी आढावा बैठक महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेतली. या बैठकीत तब्बल ३२ ते ३५ विविध विषयांवर चर्चा तसेच यापूर्वी मांडलेल्या कामांबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आमदार संजय उपाध्याय, योगेश सागर, मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, माजी जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त अभिजित बांगर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी क्षिरसागर, सहपोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभार आदींसह महापालिका, म्हाडा आणि इतर प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. (Bhagwati Hospital)

(हेही वाचा – Dr. Dabholkar मेले नसते तर ते तुरुंगात असते; अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर असे का म्हणाले?)

याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना गोयल यांनी बोरिवलीतील भगवती रुग्णालयाचे (Bhagwati Hospital) काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. हे रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्यासाठी महापालिकेने जाहिरात काढली असली तरी पहिल्याच दिवशी आमदार मनिषा चौधरी यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आपण महापालिका आयुक्तांना ही जाहिरात रद्द करावी अशी सूचना केली होती. आजच्या बैठकीतही हे रुग्णालय महापालिकेच्या पीपीपी धोरणांतर्गत न देता चॅरिटेबल ट्रस्टला चालवायला देऊन त्याठिकाणी राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान योजना आदींच्या माध्यमातूनच रुग्णांना उपचार दिले जावे. जेणेकरून पिवळे आणि भगव्या रेशनकार्डधारकांना मोफत आणि उर्वरीतांना २५ ते ५० टक्के दरात वैद्यकीय उपचार मिळतील. त्यामुळे या धोरणात बदल करण्याच्या सूचना करून सुधारीत जाहिरात काढण्याच्या निर्देश दिल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. सध्या मागाठाणेमध्ये १ हजार खाटांचे रुग्णालय उभे राहत असून पहिल्या टप्प्यात ४०० खाटा आणि दुसऱ्या टप्प्यात ६०० खाटा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच कांदिवलीमध्येही १ हजार खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ रुग्णांना दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोराईमध्ये दोन प्रसुतीगृहांच्या जागी नवीन बांधकाम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.