Balasore Accident : रेल्वेची सिग्नल यंत्रणा धोक्याची; काय सांगतो अहवाल?

163

बालासोर येथे जून महिन्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा तिहेरी रेल्वे अपघात घडल्याचं समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन सक्रिय झालं आहे. यादरम्यान, रेल्वे मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, जून महिन्यात देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर एकूण ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती.

रेल्वे मंत्रालयाच्या अहवालानुसार, जून महिन्यातील एकूण आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी २४० वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. म्हणजेच एकट्या जून महिन्यात तब्बल ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यापैकी उत्तर भागात सर्वाधिक म्हणजे १६९० वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती.

(हेही वाचा Maharashtra Assembly Session :  विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार)

गेल्यावर्षी यंदा सर्वाधिक बिघाड

एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याचा आकडा ४५ टक्क्यांनी मोठा आहे. तर, गेल्या वर्षीच्या जून महिन्यापेक्षा या जून महिन्यात ५० टक्क्यांनी अधिक वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली आहे. उत्तर विभागात सर्वाधिक म्हणजे १६९० वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती, तर, पूर्व विभागात ८०८ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत १६ हजार ४५८ वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती. तर, गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून महिन्यात हीच आकडेवारी १५ हजार १२९ होती.

इंजिन बिघाडातही वाढ

लोको फेल्युअर होण्याच्या म्हणजेच इंजिनात बिघाड होण्याच्या घटनेतही जून महिन्यात वाढ झाली आहे. १३५४ वेळा इंजिनात बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तर, मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गेल्या जून महिन्यात हीच आकडेवारी १२५० होती. यापैकी ३३७ मालगाड्यांचे इंजिन बिघडले होते, तर १५२ प्रवासी रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.