Repo Rate Cut : रिझर्व्ह बँकेची ५० अंशांची रेपो दर कपात, कर्जाचे हफ्ते होणार स्वस्त

Repo Rate Cut : पतधोरणात सर्व सदस्यांनी दर कपातीला पाठिंबा दिला

67
Repo Rate Cut : रिझर्व्ह बँकेची ५० अंशांची रेपो दर कपात, कर्जाचे हफ्ते होणार स्वस्त
  • ऋजुता लुकतुके

यावेळी कर्जात असलेल्या लोकांना अनपेक्षित सुखद धक्का देताना रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ५० अंशांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे सीआरआरही साडेचार टक्क्यांवर आला आहे. ४ ते ६ जून दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरू होती. या बैठकीत सहाही सदस्यांनी दर कपातीच्या बाजूने कौल दिला. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यानंतर दर कपातीची घोषणा केली.

या निर्णयामुळे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच बँकेनं सीआरआरही कमी केल्यामुळे बँकांना कर्ज देण्यासाठी अधिक रक्कम उपलब्ध होईल. ‘जागतिक वातावरण अजूनही अनिश्चिततेचं आहे. पण, भारतात पाच महत्त्वाच्या क्षेत्रांनी चांगली प्रगती केली आहे. त्या जोरावर भारताचा आर्थिक ताळेबंद चांगला आहे. आपण विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. अशावेळी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे आणि तेच करण्याचा मध्यवर्ती बँक म्हणून आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेपो दरात आधीच्या तुलनेत दुप्पट कपात केली आहे,’ असं संजय मल्होत्रा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते चिनाब ब्रिजचे उद्घाटन ! १० तासांचा प्रवास आता ३ तासांत)

देशात महागाई दर आटोक्यात आहे. आणि येत्या सहा महिन्यातील विकासाचा आराखडाही सुस्पष्ट आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेनं लोकांना दिलासा दिला आहे.

रेपो दर हा असा दर आहे, ज्या दराने मध्यवर्ती बँक इतर व्यावसायिक बँकांना कर्ज देते. बँकांना कर्ज स्वस्त मिळाल्यामुळे बँकाही सामान्य ग्राहकांना कमी दराने कर्ज देतात. आणि कर्जाचे हफ्ते कमी झाल्यामुळे कर्ज घेण्याचं प्रमाण वाढून लोकांच्या हातात जास्त पैसे खेळते राहतात. त्यातून बाजारपेठेतील उलाढाल वाढून अर्थव्यवस्थेला गती मिळते.

(हेही वाचा – Donald Trump यांच्यावर महाभियोग चालवा; इलॉन मस्क यांनी केले धक्कादायक खुलासे)

तीच गोष्ट कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे सीआरआरची आहे. दिवसाच्या शेवटी बँकांकडे जी रोख रक्कम जमा असते त्यातील काही टक्के रक्कम बँकांना सीआरआरच्या रुपाने रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. बाजारपेठेतील पैसा नियंत्रित करण्यासाठी साधन म्हणून मध्यवर्ती बँक सीआरआरचा वापर करते. सीआरआर कमी झाल्यामुळे बँकांकडे जास्त रोख रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका कर्ज देण्यासाठी वापरू शकतात. आणि त्यातून बाजारपेठेत जास्त रक्कम खेळती राहून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. रिझर्व्ह बँकेनं यावेळी रेपो दर आणि सीआरआरमध्येही कपात करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.