-
प्रतिनिधी
पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी निघाले आहेत. या अध्यात्मिक यात्रेच्या प्रवासात त्यांच्या थकलेल्या पावलांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. राज्यात नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना फिजिओथेरपी आणि तत्काळ उपचाराच्या माध्यमातून आराम मिळावा, यासाठी सुमारे ५ हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवार, १३ जून रोजी मंत्रालयात या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pandharpur Wari)
थकलेल्या पावलांना वैद्यकीय आधार
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील गाभा असलेल्या आषाढी वारीत सहभागी होताना वारकऱ्यांना होणाऱ्या शारीरिक त्रासावर उपाय म्हणून ‘चरणसेवा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवकांचा समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत रोज दीर्घ अंतर चालल्यानंतर थकलेल्या, सूज आलेल्या किंवा वेदनांनी ग्रस्त पायांवर शास्त्रोक्त पद्धतीने उपचार केले जात आहेत. तसेच, याच केंद्रांवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीही वारकऱ्यांना दिली जात आहे. (Pandharpur Wari)
(हेही वाचा – BCCI After Bengaluru Stampede : विजयोत्सवासाठीचे नियम करणार कडक; बीसीसीआयचा विचार सुरू)
४३ ठिकाणी मुक्काम, सेवा केंद्रांची उभारणी
वारकऱ्यांच्या दिंडीसाठी राज्यभरात एकूण ४३ ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे कार्यरत आहेत. ही सेवा स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय-खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने राबवली जात आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही सक्रिय सहभाग घेत आहेत. (Pandharpur Wari)
भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची!
पंढरपूरच्या दिशेने पावलोपावली भक्तीचा झराच वाहतो आहे. परंतु त्या प्रवासात थकलेल्या शरीराला सरकारने दिलेला ‘आरोग्यसेवेचा हात’ ही आधुनिक काळातील भावसेवा ठरते आहे. ‘चरणसेवा’ ही केवळ एक वैद्यकीय सेवा नसून, ती आधुनिक युगातील भक्ती आणि सेवेचा संगम ठरत असल्याची भावना अनेक वारकरी व्यक्त करत आहेत. (Pandharpur Wari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community