
-
प्रतिनिधी
“आपला जवळचा माणूस गमावले तरी सामाजिक भान जपत अवयवदान करणाऱ्या कुटुंबांनी अनेक जिवांना नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, अवयवदान ही एक मानवतेची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ व्हायला हवी,” असे भावनिक आणि प्रेरणादायी उद्गार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी बुधवारी व्यक्त केले.
त्यांनी सायन रुग्णालयातील झोनल ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, अवयव दान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कार्यक्रमात त्यांनी स्मृतीचिन्ह देवून या कुटुंबांचा गौरव केला. उपस्थितांना उद्देशून त्यांनी अवयवदानासंदर्भातील गैरसमज, अंधश्रद्धा आणि सामाजिक अडथळ्यांविरोधात उभं राहण्याचे आवाहन केले.
(हेही वाचा – IPL 2025, Rishabh Pant : हंगामातील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतची बॅट तळपली, शतकानंतर सॉमरसॉल्ट)
नव्या झेडसीसी केंद्रांची घोषणा – कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नाशिकमध्ये लवकरच कार्यान्वयन
आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताज्या बैठकीत राज्यातील चार नव्या शहरांमध्ये झेडसीसी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नाशिक या ठिकाणी ही केंद्रं सुरू होणार आहेत. यामुळे राज्यात अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत गतिमानता येणार असून, रुग्णांसाठी नव्या आशा निर्माण होणार आहेत.
अवयवदानाच्या प्रतीक्षेत हजारो रुग्ण – पण दात्यांची संख्या कमी
प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी सांगितले की, देशभरात हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय यांसारख्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. यासाठी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
“अवयवदान ही वैद्यकीय प्रक्रिया असली, तरी तिच्या मागे एक मोठा भावनिक, सामाजिक आणि मानवी पैलू असतो. त्यामुळे हे कार्य एक ‘मिशन’ म्हणून घेणं गरजेचं आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
(हेही वाचा – FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर)
ग्रामीण भागातही जागृती हवी – रुग्णालयांनी घ्यावा पुढाकार
कार्यक्रमात आबिटकर (Prakash Abitkar) यांनी स्पष्टपणे सांगितले की, केवळ शहरी भागापुरती मर्यादित न ठेवता, ग्रामीण भागातही समुपदेशनाच्या माध्यमातून विशेष जागरूकता मोहीमा राबवाव्यात. रुग्णालयांनी केवळ सहभाग नव्हे, तर समाजप्रबोधनात नेतृत्व घेण्याची गरज आहे.
ZTCC आणि अवयव प्रत्यारोपणात पुढाकार घेणाऱ्या रुग्णालयांचा सन्मान
कार्यक्रमात ZTCC चे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर, न्यायमूर्ती संदीप शिंदे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, तसेच महाराष्ट्रातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ZTCC चे सेक्रेटरी भरत शहा यांनी आरोग्यमंत्र्यांचे स्वागत केले आणि उपस्थित नागरिकांना अवयवदान कार्ड काढण्याचे आवाहन केले.
अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये अपोलो, ब्रिच कँडी, क्रिटीकेअर एशिया, हिरानंदानी, फोर्टीस, एशियन रिलायन्स, ग्लोबल, जसलोक, ज्यूपिटर, लिलावती, के. ई. एम., अंबानी, जी. एस. सी., कोकिलाबेन या रुग्णालयांचा समावेश होता.
(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादि मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)
महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल – आरोग्यमंत्र्यांचा आत्मविश्वास
अवयवदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वासही आबिटकर (Prakash Abitkar) यांनी व्यक्त केला. “हा विषय वैद्यकीय सीमारेषांपलीकडे जाऊन माणुसकीचा, सहवेदनेचा आणि समाज परिवर्तनाचा प्रवाह बनला पाहिजे,” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community