पुन्हा एकदा कोल्हापूरच्या मदतीला धावली मुंबई महापालिका

२०१९ साली कोल्हापूर, सांगली येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मुंबई महापालिकाने त्याठिकाणी विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती.

148

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेची एक चमू (टिम) शनिवारी कोल्हापूरकडे तसेच महाडकडेही रवाना झाला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्या मार्गदर्शनात याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

मदत कार्यासाठी गेलेली ही आहेत पथके 

यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोइंग लाॅरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करीत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत. कनिष्ठ अभियंता आकाश रैनक यांच्यासमवेत प्रस्थान केलेल्या चमुमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांसह ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री आहे.

(हेही वाचा : भाजप नगरसेवकांना डॅमेज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न!)

२०१९  च्या महापुरातही  केलेली मदत 

तीन वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१९ साली सांगली, कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांच्या नियोजनात महानगरपालिकेच्या विविध विभागातर्फे सांगली आणि कोल्हापूरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी पालिका कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेत होते.

१५ दिवस पाण्याविना राहणाऱ्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला होता!

महापालिकेच्या टिमने कोल्हापूर पालिकेच्या पंपिंग स्टेशनमध्ये जावून तेथील पंप, मोटार आदींची दुरुस्ती करून पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ववत केला होता. त्यामुळे १५ दिवस पाण्याविना राहणाऱ्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला होता. जलअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या या पथकात राजेश ताम्हाणे, सहायक अभियंता जीवन पाटील, यांत्रिकी शंकर कचरे आदींचा समावेश होता. तर खुद्द महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी स्वत: तळ ठोकून होते आणि प्रत्येक आपत्कालिन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

(हेही वाचा : …म्हणून तळयी गावात बचावपथक वेळेत पोहचले नाही! मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण!)

सांगलीला तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला होता!

तर सांगलीला घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या टिम पाठवण्यात आल्या होत्या. पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्या ४५० कर्मचाऱ्यांच्या पथकाने तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला होता. तत्कालिन अतिरिक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून कार्यकारी अभियंता सुनील सरदार आणि स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. ४५० अधिकारी कर्मचारी आणि १२ डंपर, ७ सक्शन व जेटींग व्हॅन, २ जेसीबीसह हे पथक सांगलीला रवाना होत शहरातील स्वच्छता राखली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.