Mumbra Train Accident : इच्छा तेथे मार्ग हाच रेल्वे समस्येवर एकमात्र उपाय

118

माधव गोठोस्कर

आपल्याकडे एक म्हण आहे. कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंच. कितीही नळीत घालून टाकायचा प्रयत्न करा, ते सरळ होणारच नाही. सांगायचा मुद्दा असा की, दोनच दिवसांपूर्वी झालेला रेल्वे अपघात काय मजा वाटते काय लोकांना ? काही लोक गाडीच्या टपावरून जातात, काही लोक सर्कशीसारखे प्रवास करत जातात. त्यांना आपल्या जीवाची पर्वा नसते का ? आता कालचच बघा, मुंब्रा स्टेशन बाहेरील वळणावर गाड्या इतक्या जवळ येतात. (Mumbra Train Accident) तिथे रुळांचे मोजमाप घेत आहेत. आज इतक्या वर्षात ते वळण बदललं आहे का ? इतक्या वर्षांत तिथे कधीच अपघात झाला नाही, मग तो आताच कसा काय झाला ? कारण लोक बॅगा घेऊन दरवाजात लटकत होते. एकतर बॅगा घेऊन असे लटकत होते. ही काय पद्धत आहे का ? आणि त्याहीपुढे जाऊन बॅग घेऊन अशा प्रकारे बाहेर लटकणं हीच एक मुर्खपणाची गोष्ट आहे. रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) इतकेवेळा याबद्दल सूचना करण्यात येतात की, गाडीच्या फूटबोर्डवरून प्रवास करू नका, टपावर बसून प्रवास करू नका, तरी लोक ऐकत नाहीत. याचं कारण म्हणजे गर्दी.

(हेही वाचा – Pakistan in Debt : पाकिस्तानचं कर्ज वाढून ७६,००० अब्जांवर; तरीही अर्थमंत्री म्हणतात अर्थव्यवस्था रुळावर)

ऑफिसला वेळेत पोहोचायचे, यासाठी लटकत जाणे, हा काही पर्याय नाही. एखादे दिवशी उशिरा गेले, तर चालणारच नाही का ? यासाठी कोणीच उपायांचा विचारही करत नाही की, सुचवत नाही. यावर काही उपाय करायचे म्हणजे पहिले कार्यालयाच्या कामांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. पहिले बँका सकाळी ९ ते दुपारी ४, दुसरी शिफ्ट सकाळी १० ते ५, सरकारी ऑफिसेस ११ ते ६ अशा वेळा जर ठेवल्या, तर सगळ्यांना बरं होईल. रेल्वेने प्रवास करणार्‍यांनासुद्धा दिलासा मिळेल. लंच ब्रेकमध्ये हॉटेलमध्ये गेल्यावर गर्दी असेल, तर जेवणाऱ्यांच्या मागे जाऊन उभे रहावे लागते, तसे होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती ज्या भागात राहतोय, त्याच्या जवळच्या भागातच त्याच्या कंपनीने त्याला काम दिलं, तर जास्त चांगलं होईल. उदाहरण द्यायचे तर आमच्या परिचयाची एक व्यक्ती होती. ते कल्याणवरून शिवाजी पार्क, दादर येथे पालिकेच्या कार्यालयात कामाला यायचे. आता त्यांना ठाण्याला किंवा कल्याणमध्येच पोस्टिंग करता येऊ शकत नव्हते का?, असे जर करता आले, तर किमान १० टक्के तरी गर्दी कमी होईल. आता शिवाजी पार्क भागात बऱ्याच बँका आहेत, तर मग येथील लोकांना त्यांच्या घराजवळच्या बँकेतच काम दिले, तर चालणार नाही का? त्यांना बँकेच्या मुख्यालयातच बोलावले पाहिजे का?, याचा आता विचार होणं गरजेचे आहे. आता पालिकेनेही त्या त्या भागातील कर्मचारीच घेतले, म्हणजे ठाणे भागातील कर्मचारी ठाण्यातच असे केले, तर चालणार नाही का ? यामुळे काय होईल, तर लोक वेळेवर कामावर जाऊ शकतील आणि वेळेवर घरी येऊ शकतील हा प्रमुख फायदा, सर्वांना होईल. यापुढची गोष्ट म्हणजे असं काही करता येईल का ? की दोन ट्रॅक असले, तर दोन मिनिटाला एक अशा पद्धतीने काही करता येईल. यापुढची गोष्ट म्हणजे सध्या पश्चिम रेल्वेवर धावणारी ‘सुरत एक्सप्रेस’ (Surat Express) हीच सध्या डबलडेकर गाडी आहे. अशा डबलडेकर गाड्या अजून वाढवल्या, तर चालणार नाही का ? त्या नंतर समजा एक्सप्रेस गाड्यांमधून जर लोकलपास धारकांना जायची परवानगी देता येते का ते बघायला हवे. तसे झाले, तर लोकलपास धारकांना त्याचा खुप दिलासा मिळेल. एक माझ्याच बाबतीतील एक आठवण सांगतो, मला कल्याणला एका भाषणासाठी जायचे होते; परंतु मला कुठल्याच लोकलमध्ये चढता आले नाही, शेवटी मी पंचवटी एक्सप्रेसने कल्याणला गेलो. आरामशीर बसून गेलो. मग हीच स्थिती रोज असेल, तर याच गाडीतून लोकल प्रवाशांना जायला दिले, तर ही सतत होणारी गर्दी विभागली जाईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट जर फास्ट गाड्या थेट फक्त जास्त गर्दीच्याच ठिकाणी थांबणाऱ्या गाड्या सोडता आल्या, तर अजून गर्दीचे नियोजन करता येईल. पूर्वी इंजिनवाल्या लोकल असायच्या, तशा पद्धतीने परत गर्दीच्या वेळी जास्त पॉवरफुल गाड्या चालवता आल्या, तर गर्दीच्या वेळी वाहतूक लवकर होऊ शकते. हा विचार रेल्वे प्रशासनाने केला पाहिजे. लोकांची चूक यात नाही. ही बाब लक्षात घ्यायला हवी.

एका फास्ट लोकलच्या (Fast Local) बरोबर एक त्याच ठिकाणी जाणारी स्लो लोकल अशी व्यवस्था करता आली, तर त्याचा विचार करायला हवा. लोकांनीही प्रवास करताना नको तो अगोचरपणा न करता व्यवस्थित नियम पाळून प्रवास करणे गरजेचे आहे. त्यातही आता किती गाड्या वाढवणार याचा विचार होणे गरजेचे आहे. आता उपनगरांची व्याप्ती पार नाशिकपर्यंत पोहोचली आहे. त्यानुसार त्या गर्दीचा विचार करून रेल्वेचे नियोजन केले पाहिजे. त्याच्या जोडीला रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांचाही विचार करायला हवा. आता पुण्याला जायला दोन महामार्ग आहेत, त्यातील जुन्या महामार्गावरून फक्त अवजड गाड्या आणि खासगी गाड्या नव्या महामार्गावरून असे केले, तर त्यातून गाड्यांची संख्या वाढवता येईल. त्यातून गर्दीचे नियोजन होईल. शेवटी नियोजनातून, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करूनच यावर मार्ग काढता येईल. फक्त इच्छाशक्ती हवी, हाच यावरचा मार्ग आहे. (Mumbra Train Accident)

(लेखक प्रसिद्ध माजी आंतरराष्ट्रीय पंच आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.