Modi Government : मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त या सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान आयोजित केले आहे.

416
Indian Economy : जागतिक अनिश्चितता सहन करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी, 29 मे रोजी मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचे प्रमुख प्रवीण दरेकर, राष्ट्रीय प्रवक्ता सैयद जफ़र इस्लाम आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या ९ वर्षांत देशाला दहशतवादापासून मुक्त करणाऱ्या मोदी सरकारने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त या सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेद्वारे मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला. सीतारमण यांनी सांगितले की, मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत गोरगरीब, वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे महत्वाचे काम केले. गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी अडीच कोटी घरे आणि ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत, ९ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना उज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर दिला जात आहे, या योजनेतील सिलिंडरवर २०० रुपये सबसिडीही दिली जात असून आयुष्मान योजनेतून ५ लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जात आहेत. करदात्यांच्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोदी सरकारने डीबीटी प्रणाली प्रत्यक्षात आणली, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लसीचे २२० कोटी डोस मोफत देऊन लसीकरण अभियान प्रभावीपणे अंमलात आणले. याच काळात जगभरात अडकलेल्या लाखो भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणले गेले. सीरिया, येमेन, युक्रेन आदी देशांत अडकलेल्या २० हजारांहून भारतीयांना मोदी सरकारने भारतात आणले. मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, असे नमूद करतानाच मोदी सरकारच्या काळात गेल्या ९ वर्षांत विमानतळ, द्रूतगती महामार्ग, व्यवस्थापन शिक्षण संस्था (आयआयएम), आयुर्विज्ञान संस्था (एआयएमएस), आयआयटी यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सीतारमण यांनी आकडेवारी सादर करीत सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या योजनांच्या महाराष्ट्रातील लाभार्थींची आकडेवारीसह माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.