-
सचिन धानजी, मुंबई
मे महिना संपल्यानंतरही मिठी नदीच्या (Mithi River) सफाईचे काम ५५ टक्केच पूर्ण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नदीतून काढून ठेवलेला गाळ वाहून गेला त्यातच गाळाची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून चिखल स्वरुप परिस्थिती निर्माण झाल्याने गाळाची वाहतूक पूर्णपणे थांबली गेली होती. मात्र, आतापर्यंत मिठी नदीच्या सफाईसाठी किमान ८५ दिवसांचा अवधी मिळत होता, परंतु यंदा या सफाईसाठी केवळ ५६ दिवसच मिळाल्याने आता सफाईसाठी एक महिन्याचा कालावधी वाढवून देण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील मिठी नदीची (Mithi River) गाळाची सफाई तीन भागांमध्ये विभागून नियुक्त कंत्राटदारांमार्फत केला जाता. यंदा मिठी नदीतील गाळाच्या सफाईला ५ एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत मिठी नदीतील गाळाची सफाईचे काम ५५.२७ टक्केच झालेले आहे. मिठी नदीतून २ लाख १४ हजार ३१५ मेट्रिक टन एवढा गाळ काढणे अपेक्षित असून त्यातील आतापर्यंत १ लाख ११८ हजार ४४९ मेट्रिक टन एवढाच गाळ काढण्यात आला आहे. या गाळाची विल्हेवाट महापे येथील डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत केली जात होती. परंतु मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात पाणी साचून दलदलीच परिस्थिती निर्माण झाली. परिणामी गाळ वाहून नेणारे डंपर वाहतूक करण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळे गाळाची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. तसेच पावसामुळे नदीच्या पात्राशेजारी काढून ठेवलेला गाळही आसपासच्या भागांत वाहून गेला.
(हेही वाचा – पावसाळ्यापूर्वी रेल्वे ट्रॅकवर उतरले मंत्री Ashish Shelar; म्हणाले, ब्लेम गेम थांबवा, समन्वयाने काम करा!)
मात्र, मिठी नदीच्या (Mithi River) सफाईसाठी यंदा केवळ ५६ दिवसांचा अवधी मिळाला असून त्यातत एआय सॉफ्टवेअरवरील नोंदणी आणि त्यानंतर डंपर भरुन गाळाची वाहतूक करताना होणारा विलंब, आलेला पाऊस आणि त्यामुळे वाहून गेलेला गाळ, डम्पिंग ग्राऊंडवर साचलेले पाणी आदींमुळे सफाईच्या कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे यंदा आधीच सफाईसाठी अवधी कमी मिळाला, त्यातच पावसाने घोळ घातल्याने ३१ मे किंवा ५ ते ६ जूनपर्यंत गाळाची सफाईचे टार्गेट पूर्ण केले जाणे अपेक्षित होते, ते अजून पूर्ण झालेले नाही.
मिठी नदीचे (Mithi River) यापूर्वी सन २०२३ ते सन २०२४ या दोन वर्षांपूर्वी गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली हाती. यामध्ये सन २०२३ मध्ये मार्च महिन्यात सफाईला सुरुवात झाली आणि ६ जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कंत्राटाच्या पहिल्या वर्षी ८५ दिवसांचा अवधी मिळाला आण दुसऱ्या वर्षी कंत्राट सुरु असल्याने कंत्राटदारांनी जानेवारीपासून सफाई कामाला सुरुवात केली आणि ३१ मे पर्यंत पूर्ण केले. त्यामुळे मागील वर्षी १३६ दिवसांचा कालावधी सफाईसाठी मिळाले होते. परंतु यंदा लाँग बूम पोकलेन मशिनचा वापर करण्याची सक्ती केल्याने निविदा प्रक्रियेला विलंब झाला आणि प्रत्यक्ष मंजुरी होऊन कामाला ५ एप्रिल रोजी सुरुवात झाल्याने प्रत्यक्षात सफाईसाठी ५६ दिवस प्राप्त झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून हा कालावधी एक महिन्यांनी वाढवून देण्याचा विचार सुरु आहे. याबाबत मिठी नदीच्या (Mithi River) गाळाची सफाई करणाऱ्या कंत्राटदारांनी महापालिकेला मुदतवाढ देण्याची विनंती केली असल्याची माहिती मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community