महाराष्ट्रात मान्सूनचं (Maharashtra Monsoon Update) आगमन झालं आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील उर्वरित भागातही पाऊस बरसत आहे. मुंबईत तर मान्सूनच्या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी इमारती कोसळण्याच्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मान्सूनच्या पहिल्याच पावसात काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. विशेष म्हणजे आगामी चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Maharashtra Rain Update)
(हेही वाचा – Jail : ‘प्रयास’ चा सकारात्मक स्पर्श; बंद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृहांमधून नवा प्रकाश)
पाहिल्या पावसाचे ५ बळी
मुरबाड तालुक्यातील इंदे येथील दहावी उत्तीर्ण झालेला १९ वर्षीय यश रमेश लाटे याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली धरणात बुडून अविनाश कुंडलिक भोईर याचा मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात सोमवारी सकाळी अंगावर वीज कोसळून रोशन कालेकर या तरुणाचा मृत्यू झाला. तो फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली.
मान्सूनच्या पहिल्याच पावसात विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे स्लॅबचे प्लास्टर डोक्यावर पडल्याने 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. विरारच्या गोपचरपाडा परिसरातील पूजा अपारमेंट मधील रूम नंबर 335 मध्ये सोमवारी दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी राजू सिंग असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून ती आपल्या दोन मुलांसह घरात झोपली असता ही दुर्घटना घडली. याघटनेत दोन्ही मुले सुदैवाने थोडक्यात बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहचून मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढले आहे.
(हेही वाचा – Ram Setu ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी)
दरम्यान, मुरबाडच्या कांदळी येथील दोन दुधाळ म्हशी व कल्याणच्या फळगांव येथील चार वासरे वीज पडून दगावली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पुण्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू
जोदरार पावसामुळे पुण्यातही मोठे नुकसान झाले आहे. मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला ही घटना घडली. संतोष गुलाब खांडवे असे वीज पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाचा मोबाईल तसेच अंगावरील कपडे विजेमध्ये खाक झाली आहेत.
(हेही वाचा – IPL 2025, MI vs PBKS : मुंबईला ७ गडी राखून हरवत पंजाब आघाडीवर, मुंबई राहणार चौथ्या स्थानावर)
राज्यात इतर भागात काय घडलं ?
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात कुरुबावी गावालगत नदीपात्रात अडकलेल्या सहा लोकांची सुटका
पंढरपुरमध्ये चंद्रभागेच्या पात्राला पुराचे स्वरूप; सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा
सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत असून, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली
सातारा जिल्ह्याच्या आंधळी व मलवडी या मंडळांमध्ये ९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद, ढगफुटीसदृश पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील जगबुडी नदीचे पात्र इशारा पातळीच्या वर ओसंडून वाहू लागले आहे
रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्यांत ३०० मि.मी. हून अधिक सरासरीची नोंद
ठाणे जिल्ह्यात यश लाटे (१९) याचा वीज कोसळून तर चिखलोली धरणात बुडून अविनाश भोईर याचा मृत्यू
पनवेलच्या खारघर सेक्टर ६ जवळील ड्रायव्हिंग रेंज येथे धबधब्यात अडकलेल्या मुंबईतील ५ तरुणांची करण्यात आली सुखरूप सुटका
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत वाढ, सहा बंधारे पाण्याखाली आहेत.
हेही पहा –