मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी 7-8 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. काळ्याकुट्ट ढगांमुळे मुंबईतील (Mumbai Rain Update) दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका हवाई सेवेला बसला आहे. (Maharashtra Rain Update)
(हेही वाचा – शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार; Adv. Manikrao Kokate यांची माहिती)
सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला. मान्सूनने मुंबई दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला. मान्सून याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मान्सून 26 मे रोजी मुंबई दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.
रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईतील भुयारी मेट्रोला फटका; मेट्रो रेल्वे बंद
मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला. त्यामुळे आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद असून, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद करण्यात आले आहेत.
केईएम रुगाणालयात शिरले पाणी
केईएम रुगाणालयातील रेडिओलॉजी डिपार्टमेंटसमोर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने पाणी काढण्याच काम सुरू आहे. मात्र हा रुग्णालयात रुग्णांचा येण्याजाण्याचा रस्ता असल्यामुळे या भागात मोठी गर्दी देखील झाली आहे.
(हेही वाचा – IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद संघाचा कोलकाता नाईट रायडर्सवर ११० धावांनी विजय !)
पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिसांनी सबवे बाहेर बॅरिकेट लावून सबवे बंद केला आहे. सध्या अंधेरी सबवे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहन चालकांना अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्यासाठी पोलीस सूचना देत आहे. सध्या सबवेमध्ये भरलेला पाणी पालिकेचे कर्मचारी जनरेटरच्या माध्यमातून बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
रायगडमध्ये बायपास मार्ग खचला
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड (Raigad Fort) महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Nariman Point to palghar : मुंबईत होतेय आणखी एक सी-लिंक ! मरीन ड्राईव्ह ते पालघर प्रवास फक्त सव्वा तासात)
पुण्यात मान्सून दाखल
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे .मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून काल रात्रीपासून मुंबईसह पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली .अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे . पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता .गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे .
हवामान विभागांना (Meteorological Departments) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागांना दिली असून पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचं ही सांगितलंय. मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी अध्यापक पेरण्या करू नये असे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Ekanath Shinde) यांनी या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडूनही परिस्थितीची माहिती घेतली व मदत कार्याबाबत सूचना दिल्या. या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे 24 तास सुरू राहतील आणि या पक्षातल्या अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे असेही निर्देश दिले.
तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?)
राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community