Maharashtra : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे १९,२४४ कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक भोपाळ येथे पार पडली.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाचा आम्ही पूर्वीच संकल्प केला होता. आज त्यावर दोन्ही राज्यांनी सहमती केली आणि त्यासाठी सामंजस्य करार झाला. यापूर्वी ही बैठक २००० मध्ये झाली होती, त्यानंतर २०२५ मध्ये ही बैठक झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा Firecrackers Ban : मुंबईत फटाके-रॉकेट विक्रीवर बंदी; नेमकी काय कारण? वाचा )
ते पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला २,३४,७०६ हेक्टरला सिंचनलाभ होईल, तर मध्यप्रदेशला १,२३,०८२ हेक्टर सिंचनलाभ मिळेल. महाराष्ट्रात जिथे खारपाणपट्टा असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या समस्या आहेत, तेथे मोठा लाभ या प्रकल्पामुळे होणार आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी दिली.
या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.Maharashtra
Join Our WhatsApp Community