आरोग्य विभागातील पदभरतीसाठी घेण्यात येणा-या परीक्षेला अवघा एक दिवस बाकी असताना, अचानक आरोग्य विभआगाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहे निर्णय?
आरोग्य विभागातील पदभरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण परीक्षेसाठी लागणा-या प्रवेश पत्रकात(हॉल तिकीट) काही त्रुटी असल्याचे आढळल्याने आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करत ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत विद्यार्थ्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.
आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटांत असंख्य चुका आढळून आल्या होत्या. संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ करत या चुका केल्याने नाईलाजाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. परीक्षा अचानक रद्द केल्याने परीक्षार्थांना होणार त्रास आपण समजू शकतो. त्याबद्दल मी आपली माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
काही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणा-या गोष्टींमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. तसेच परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे नियोजन करण्यास सांगण्यात आले होते. परंतु तरीही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलावी लागत असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community