तौक्तेनंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय! वाचा…

चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज कोसळून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत.

113

राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अजित दादांनी घेतली बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचाः तौक्ते वादळग्रस्तांना अशी मिळणार नुकसान भरपाई)

काय म्हणाले अजित दादा?

गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानीची तीव्रता कमी करण्यासाठी, किनारपट्ट्यांवरील जिल्ह्यांत आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावीत, ही बहुउद्देशीय निवारा केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सक्षम असावीत. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळी या निवारा केंद्रांचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी करण्यात यावा. यासाठी कायमस्वरुपी देखभाल, दुरुस्तीचेही नियोजन करण्यात यावे.

लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत

या जिल्ह्यांतील सर्व वीज वाहिन्या प्राधान्याने भूमीगत कराव्यात. चक्रीवादळाच्या वेळी निर्माण होणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांनी जमिनीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज कोसळून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत. ही सर्व कामे दर्जेदार, मजबूत, गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत, यासाठी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.